दहावी- बारावीच्या निकालाची तारीख ठरली! विद्यार्थ्यांनो, पुढच्या प्रवेशासाठी काढून ठेवा ‘हे’ दाखले; दाखल्यांसाठी आता गावातूनच करता येतील अर्ज

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा राज्य बोर्डाचा निकाल मे अखेर जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, बारावी उत्तीर्ण प्रत्येक विद्यार्थ्याला पुढच्या प्रवेशासाठी शासनाचे विविध प्रमाणपत्रे व दाखले असणे आवश्‍यक आहे.
sakal solapur
sakal exclusivesakal

सोलापूर : इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा राज्य बोर्डाचा निकाल मे अखेर जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, बारावी उत्तीर्ण प्रत्येक विद्यार्थ्याला पुढच्या प्रवेशासाठी शासनाचे विविध प्रमाणपत्रे व दाखले असणे आवश्‍यक आहे. सोलापूर जिल्ह्यातील तेराशे आपले सरकार सेवा केंद्रांवरून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या प्रमाणपत्रासाठी किंवा दाखल्यांसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. त्यासाठी शासनाने ठरवून दिलेले शुल्क घेणे केंद्र चालकांसाठी बंधनकारक आहे.

वार्षिक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरवात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढच्या प्रवेशासाठी तथा शिक्षणासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आताच काढून घ्यावीत. बरेच पालक निकालाची वाट पाहतात आणि त्यानंतर कागदपत्रे काढायला सुरवात करतात. पण, असे न करता आताच कागदपत्रे काढून घेणे आवश्‍यक आहे. जेणेकरून प्रवेश घेताना धावपळ होणार नाही व शैक्षणिक नुकसान टळेल. दुसरीकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करतात त्यांनीसुद्धा कागदपत्रे काढून घ्यावीत. अनेक कागदपत्रांची मुदत ३१ मार्चपर्यंतच असते, त्यामुळे सध्या आपल्याकडे असलेल्या कागदपत्रांची मुदत संपली की नाही, याची देखील त्यांनी खात्री करावी, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञांनी केले आहे.

‘ही’ कागदपत्रे काढावीच लागतील

  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र (एक किंवा तीन वर्षाचे)

  • अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल)

  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र

  • जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र

  • ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (मुदत एक वर्ष असते)

  • एसईबीसी (कुणबी नोंद न सापडलेल्यांसाठी)

  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (मुदत तीन वर्षे असते)

  • केंद्र शासन जात प्रमाणपत्र (मुदत एक वर्षाची असते)

  • भूमिहीन किंवा शेतमजूर प्रमाणपत्र

  • अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र

  • शेतकरी प्रमाणपत्र

  • एसईसी (कायम रहिवासी प्रमाणपत्र) व रहिवासी प्रमाणपत्र

ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज वेळेत करा अन्‌ प्रमाणपत्र वेळेत मिळवा

इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी वेळेत करून घ्यावी. त्यासाठी जात पडताळणी समितीकडे ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परिपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव समितीकडे सादर करावा. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वेळेत प्रमाणपत्र मिळेल. प्रमाणपत्र देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते, पण विद्यार्थ्यांना प्रवेशास कोणतीही अडचण येणार नाहीत, त्या दृष्टीने प्रमाणपत्र दिले जाते.

- सचिन कवले, सचिव, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर

सर्वच आपले सरकार सेवा केंद्रांवर अर्ज करण्याची सोय

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांसाठी आपले सरकार सेवा केंद्रांवरून ऑनलाइन अर्ज करता येतो. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार संबंधित केंद्रांवरून अर्ज करू शकतात. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसह बहुतेक गावांमध्ये ती केंद्रे आहेत. आठ-दहा दिवसांत सेतू सुविधा केंद्रे सुद्धा सुरू करण्याचे नियोजन आहे.

- मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी, सोलापूर

‘येथे’ करा जात पडताळणीसाठी अर्ज

व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. शासनाच्या https://www.barti.com किंवा http://ccvis.com या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची सुविधा आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधिताने समितीला ऑफलाइन प्रस्ताव देखील देणे अपेक्षित आहे.

जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रे

  • एकूण मंजूर केंद्रे

  • १,६७०

  • सुरू असलेली केंद्रे

  • १,३११

  • बंद असलेली केंद्रे

  • ३५९

  • बंद सेतू सुविधा केंद्रे

  • १२

बारावीचा २५ मे तर दहावीचा निकाल ३१ मेपर्यंत

राज्य मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल २५ मेपर्यंत (पुढील आठवड्यात) तर इयत्ता दहावीचा निकाल ३१ मेपूर्वी जाहीर होणार आहे. पुणे बोर्डाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली असून निकालाची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com