
पुणे : "पूरपरिस्थिती टाळण्यासाठी यंदा राज्यातील धरणांमध्ये ऑगस्टपर्यंत 70 टक्केच पाणीसाठा ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी धरणातील पाणी सोडण्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल आणि पूरपरिस्थिती टाळण्यास मदत होईल,' अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. दरम्यान याविषयीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पावसामुळे झालेले नुकसान आणि पुढील नियोजनासाठी वडेट्टीवार यांनी रविवारी (ता.७) पुण्यात बैठक घेतली. त्यांनतर ते पत्रकारांशी बोलत होते. मागील काही वर्षापासून अपुरा पडणारा पाऊस आणि दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता सुरुवातीस धरणे 100 टक्के भरली जात होती. 100 टक्के धरणे भरल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यात येत होते. मात्र मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यावेळी आधीच धरणे 100 टक्के भरली होती. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे काही जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वडेट्टीवार म्हणाले, "सध्यस्थितीत काही धरणांमध्ये 15 ते 25 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. यंदा पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे. धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा, एकूण पाऊस, धरणांमध्ये येणारे पाणी आदीबाबींचा विचार करून ऑगस्ट महिन्यात धरणांमध्ये सुमारे 30 टक्के पाणी कमी म्हणजे 70 टक्के पाणी ठेवण्यात येणार आहे. याविषयीची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात आली आहे.'
निसर्ग या चक्रीवादळामुळे पुणे विभागात झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी यावेळी घेतली. सांगली आणि कोल्हापूरला मागील वर्षी आलेला पूर लक्षात घेता यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासन बचावा कार्यासाठी 116 बोटी लवकरच खरेदी करणार आहे.
पुणे विभागासाठी बोटी व आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. दरम्यान चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान झाले आहे, या नागरिकांना अधिक मदत मिळण्यासाठी निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे वडेट्टीवर यांनी सांगितले.
मागील वर्षी सांगली व कोल्हापूरला आलेल्या पूराच्या परिस्थितीचा अभ्यास करून उपाय योजना ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीने अलमट्टी धरणामुळे पूर येत नसल्याचे आपल्या अहवालात नमूद केले आहे.
त्यावर राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले," अलमट्टी धरणातील पाणीसाठा हे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूर येण्याच्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण आहे. अलमट्टी धरणातून किती विसर्ग करण्यात येतो. याची माहिती दिली जात नाही. अलमट्टी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाणी संदर्भातील वस्तुस्थिती मांडण्यात येणे अपेक्षित आहे.''
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.