शेतकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य - उद्धव ठाकरे

खरीप हंगामपूर्व नियोजन : मुख्यमंत्र्यांची घोषणा, महाराष्ट्र देशात प्रथम
agricultural sector Chief Minister Uddhav Thackeray on farmer health Kharif season mumbai
agricultural sector Chief Minister Uddhav Thackeray on farmer health Kharif season mumbaisakal

मुंबई : ‘‘शेतकरी बांधवांच्या उत्तम आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण मोफत देण्याची घोषणा करतानाच शेतकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले. राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०२२ चे आयोजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृहात केले होते. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान असून सरकारने विकासाची पंचसूत्री स्वीकारली आहे.

त्यातूनच कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड द्या, असे आवाहन करत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, की ज्या राज्यात शेतकरी सुखी ते राज्य सुखी. शेतकरी कष्ट करत असताना स्वत:च्या, कुटुंबाच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण मोफत देणार आहे. शेतकरी आपल्या कुटुंबातले घटक आहेत. त्यामुळे यंत्रणेने आपुलकीने कुटुंबासारखे काम करावे. ‘विकेल ते पिकेल’ अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन केले पाहिजे. शेतमालाला हमी भाव आहे, पण हमखास भाव मिळाला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

निर्यातीत महाराष्ट्र अव्वल

द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, कांदा, मिरची या पिकांच्या निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाच्या एकूण निर्यातीच्या ६५ टक्के फळे, ५५ टक्के भाजीपाला महाराष्ट्रातून निर्यात होतो. देशात सर्वाधिक चार हजार ५०० शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. ही आपल्या महाराष्ट्राची बलस्थाने आहेत, असे बैठकीत सांगण्यात आले.

खरीप हंगामासाठी

  • खरीप हंगाम २०२२ मध्ये प्रमुख अन्नधान्य पिकांचे १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित

  • खरीप हंगामात खोडमाशीच्या प्रादुर्भावाची शक्यता गृहीत धरून तो रोखण्यासाठी उपाययोजना

  • पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे कृषीमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांना खते कमी दरात वेळेत मिळण्यासाठी कृषी विभागाने केंद्र सरकारच्या संपर्कात राहावे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करावे. कृषी विभाग योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो. या विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करू देण्यात येईल.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

राज्याच्या विकासात कृषी विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. फलोत्पादनात आपल्या राज्याने मोठं काम केले आहे. राज्याच्या दृष्टीने येणारे चार महिने महत्त्वाचे आहेत. खरीप हंगामात येणाऱ्या समस्यांवर मात करत हा खरीप हंगाम यशस्वी करायचा आहे.

- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

दर्जेदार, प्रमाणित बियाणांचा पुरवठा करण्याबरोबर कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची दक्षता घेतली आहे. सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने पेरा वाढण्याची शक्यता असून त्यासाठी बियाणांची उपलब्धता वाढविण्याचे नियोजन केले आहे.

- दादा भुसे, कृषीमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com