बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर आज राज्यावर शोककळा पसरली आहे. बाबासाहेबांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहन्यात येते आहे. राजकीय क्षेत्रातील नेत्यांकडूनही सोशल मिडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली जात आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची हानी झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, 'ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, 'जाणता राजा' सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेबांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर वृद्धापकाळानं त्यांचे निधन झाले आहे.त्यांचं जाणं साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाला चटका लावून गेलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.