मुंबई - मागील १५ दिवसांच्या अनेक धक्कादायक घडामोडींनंतर राज्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सत्तांतर घडवून आणत सरकार स्थापन केलं. शिवसेनेचे अनेक आमदार मुंबई सोडून सुरतला गेल्याच समोर आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. मात्र शिवसेनेच्या आमदारांसोबत महाविकास आघाडीतील राज्यमंत्री आणि प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू देखील होते. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. मविआमध्ये मंत्रीपद असताना देखील बाहेर पडलेल्या बच्चू कडू यांनी नव्या सरकारमध्ये हव्या असलेल्या मंत्रीपदापदाबाबत आपली इच्छा व्यक्त केली. (Bachu kadu wants Social Justice Ministry)
एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आता मंत्रीपद कोणाला मिळेल, कोणतं खातं मिळेल हा आमचा विषय नाही. आमचा विषय सामान्य माणसाचा, मतदार संघाच्या विकासाचा आहे. महाराष्ट्रातील अपंग बांधव, शेतकरी यांच्यासाठी काय करता येईल, हेच आमच्या डोक्यात असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं. सरकार लवकर कोसळणार अशी टीका होतेय यावर कडू म्हणाले की, मागच्या सरकारमध्ये देखील देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, सरकार कोसळणार आता विरोधक म्हणतात सरकार कोसळणार, पण तस काही होत नसतं.
आपली एकनाथ शिंदे यांच्याशी चांगली मैत्री आहे. त्यांच्या मैत्रीमुळेच आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो, असा खुलासा करताना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता असंही कडू यांनी स्पष्ट केलं. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जोड फेविकॉल पेक्षाची अधिक घट्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं.
दरम्यान बच्चू कडू यांना कोणतं मंत्रीपद हवं याविषयी विचारण्यात आलं. त्यावर कडू म्हणाले की, माझा विषय अपंग बांधवांचा आहे. अपंग बांधवांची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी समाजकल्याण खातं दिलं तर चांगली होईल. तर अमरावतीमधील कार्यकर्त्यांना आपण पालकमंत्री व्हाव अशी इच्छा आहे. हे मिळालं तर चांगलच, नाहीतर रामकृष्ण हरी असं कडू यांनी म्हटलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.