
बाळासाहेब म्हणाले होते...‘उद्धव अन् आदित्यला सांभाळा’! जिल्हाप्रमुख उध्दव ठाकरेंसोबत
सोलापूर : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्यच असेल. आम्ही सरकारचे नव्हे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, अशी भूमिका जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. स्व. बाळासाहेबांनी सांगितले होते, ‘माझ्या मागे उद्धव अन् आदित्यला सांभाळा’, याची आठवणही त्यांनी सांगितली.
हेही वाचा: मी पुन्हा येईन! राज्यसभा, विधान परिषदेनंतर आता सत्तापरिवर्तनाचा प्लॅन?
जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख असून त्यात पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, धनंजय डिकोळे आणि संभाजी शिंदे यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक, नारायण राणे यांनी पक्ष सोडला. तरीही, पक्षाला काहीच फरक पडला नाही. आता एकनाथ शिंदे हे पक्ष सोडणार नाहीत, तरीदेखील त्यांच्या बंडामुळे पक्षावर काहीच परिणाम होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. सरकार येतील-जातील, पण शिवसेना स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर भक्कमपणे उभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पण, आमदारांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांना राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुखांनी प्रत्येक तालुकाप्रमुखाशी संपर्क ठेवायला सुरू केला आहे. दरम्यान, मागील अडीच वर्षांत ‘आमचे महाविकास आघाडीचे सरकार’ म्हणून गाजावाजा करणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांची भूमिका बदलल्याचे दिसत आहे. आता प्रत्येकजण, आम्ही शिवसेनेचे सैनिक असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत आम्ही असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत दिसणार नाही, अशी परिस्थिती आहे.
हेही वाचा: ‘ईडी’च्या धास्तीनेच राजकीय उलथापालथ! दोन मंत्री तुरुंगात, राहुल गांधीही सुटले नसल्याची भीती
‘काँग्रेस’मधून पक्षांतर वाढण्याची भीती
आगामी काही महिन्यांत महापालिका, जिल्हा परिषदेसह नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. राज्यात सत्ता असतानाही मंत्र्यांनी, आमदारांनी त्यांच्या मतदार संघाशिवाय इतर मतदारसंघांकडे फारसे लक्ष दिले नाही. ‘शहर मध्य’च्या आमदार प्रणिती शिंदे यांनी निधी आणला, पण त्यांच्याच मतदारसंघात सर्वाधिक खर्च केला. राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून आम्हाला निधी मिळत नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर करूनही त्या नगरसेवकांना पुरेसा निधी मिळाला नाही. आगामी निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेशी टक्कर देताना आपला विजय कठीण होईल, अशी चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाल्यास महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षांतर वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा: सोलापूर पोलिसांची ‘सीएमआयएस’ प्रणाली! एका क्लिकवर समजणार गुन्हेगारांची कुंडली
भरणेमामा नसतील तर ‘त्यांना’ साथ कोणाची?
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आनंद चंदनशिवे, महेश कोठे, तौफिक शेख, ॲड. यू. एन. बेरिया यांच्यासह अनेकांना विकासकामांसाठी भरपूर निधी दिला. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच सर्वांत स्ट्राँग पक्ष असल्याचा आत्मविश्वास बाळगून त्यांनी पूर्वीच्या पक्षाला रामराम ठोकून पक्षांतराची वाट धरली. पण, राज्यातील सरकार कोसळल्यास पालकमंत्री भरणे हे इंदापूर येथेच असतील. त्यावेळी राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक नेत्यांना कोण बळ देणार, असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
हेही वाचा: शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! वेळेच्या अर्धा तास अगोदर शाळेत न येणारे शिक्षक बिनपगारी
भाजपमधील नाराज झाले शांत
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल की नाही, याची चिंता काही जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांना तथा इच्छुकांना होती. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतून नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला होता. पण, माध्यमांवर लक्ष ठेवून राज्यातील प्रत्येक राजकीय घडामोडीवर लक्ष देत त्यांनी पक्षांतराचा विचार बदलल्याचीही चर्चा आहे. आपला नेता दुसऱ्या पक्षात गेल्याने काहीजण निवडणुकीपूर्वी त्यांच्यासोबत जाण्याच्या प्रयत्नात होते, आता त्यांनीही विचार बदलला आहे.
हेही वाचा: ११वी प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून! १८ जुलैपासून सुरु होणार महाविद्यालये
...तर आताचे सख्खे मित्र होतील पक्के शत्रू
भाजपला सोडून शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर तिन्ही पक्षांनी बहुतेकवेळा केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध आंदोलने केली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर कडव्या शब्दांत आरोप-प्रत्यारोप केलेले नेते, पदाधिकारी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून भाजपविरुद्ध काम करू लागले. पण, आता राज्यातील सरकार कोसळल्यावर तेच नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार पुन्हा एकदा एकमेकांवर टीका करतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणून प्रचार करतील.
Web Title: Balasaheb Thakare Had Said Take Care Of My Uddhav And Aditya With District Chief Uddhav
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..