मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आज ईडीने (ED) कारवाई करत अलिबाग आणि दादर येथील मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी आपण एक पैशाचाही घोटाळा केलेला नाही, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी समाचार घेतला असून, एक पैशाचा घोटाळा नसल्याचा पत्रकारांना सांगून काही फायदा नाही असा चिमटादेखील चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना काढला आहे. (Bjp Chandrakant Patil On Sanjay Raut)
तसेच जर काही घोटाळा नसेल तर, त्यांनी न्यायालयात जावे आणि सिद्ध करावे. राऊतांच्या एक पैशाच्या घोटाळा नाही अशा विधानावर जनतापण विश्वास ठेवणार नाही असेदेखील पाटील म्हणाले. सत्तेत असल्यापासून आणि आता राऊत वापरत असलेल्या शब्दांचे पुस्तक काढण्याचे काम आपण एकाला दिले आहे. तसेच राऊत वापरत असलेले शब्द महाराष्ट्रातल्या संस्कृतीत बसतात का? असा प्रश्न सामान्य जनतेला विचारणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राऊत अशाप्रकारे बोलणे हे नवीन नसल्याचे सांगत राऊत आपल्यावर अनेकदा बोलले आहेत. त्यामुळे त्यांना जे संस्कार आहेत त्याप्रमाणे ते बोलतात असेदेखील पाटील यांनी म्हटले आहे. राऊत यांच्यावरील कारवाई जर चुकीची असेल तर, न्याय व्यवस्था काही विकली गेलेली नाही. त्यामुळे या कारावाईविरोधात ते न्यायालयात दाद मागू शकतात, असेदेखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
भविष्यात भाजप नेत्यांचाही नंबर
दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना पुढचा नंबर भाजप नेत्यांचा असेल असा इशार दिला आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, आम्ही चळवळीतील माणसं असून, आम्ही जर काही चूक केली असेल तर आम्हाला शासन झालंच पाहिजे. त्यामुळे आम्ही जर काही चूक केली असेल तर, त्याचे परिणाण आम्हाला भोगावे लागतीलच. त्यामुळे धमक्या देण्याचे कारण नाही. आम्हीदेखील माणसंच आहोत. काही चूक झाली असेल तर, आमच्यावरीह कारवाई करा असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.