
मोठी बातमी! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; CM शिंदेंनी सानुग्रह अनुदानात केली वाढ
राज्यातल्या संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानात वाढ केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली होती की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार. त्यानंतर विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं होतं. राज्य सरकारने आज सानुग्रह अनुदानात वाढ केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचे ५० रूपये देण्याची घोषणा केली आहे.
सानुग्रह अनुदान देताना मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी कांद्याच्या प्रश्नावरुन सरकारला जाब विचारला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भारताच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ४३ टक्के वाटा हा आपल्या राज्याचा आहे."
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "बाजारात लाल कांद्याची आवक जास्त आहे. देशातल्या इतर राज्यांमध्ये उत्पादन वाढलं आहे. मात्र कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळेच आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती नेमली. यामध्ये निर्णय झाल्याप्रमाणे आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देत आहोत. २०० रुपयेची शिफारस होती, पण आम्ही ३०० रुपये देत आहोत."