मोदी व्यवस्थेला संपवण्यासाठी एकत्र या; नाना पटोलेंचे आवाहन

Come together to end the Modi system; Appeal of Nana Patole
Come together to end the Modi system; Appeal of Nana Patole

सांगली : ज्याप्रमाणे इंग्रज वागत होते, त्याप्रमाणे भाजप वागत आहे. त्यामुळे आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे. त्यावेळी जे युद्ध लढलो, ते आजही आपल्याला लढावे लागेल. भारतमातेचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर आहे. सर्वांनी एकजुटीने देश बरबाद करायला निघालेल्या मोदी आणि भाजप व्यवस्थेला संपवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी येथे केले.

प्रदेशाध्यक्ष श्री. पटोले आज सांगली दौऱ्यावर आले असताना कॉंग्रेस भवनला भेट दिली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी श्री. पटोले बोलत होते. जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शैलजा पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील, उपमहापौर उमेश पाटील, विठ्ठल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पटोले म्हणाले, ""देशातील इंग्रजी राजवट हाकलून लावण्यासाठी, अन्यायी व जुलमी व्यवस्थेविरोधात कॉंग्रेसची निर्मिती झाली; परंतु आज देशात पुन्हा एकदा इंग्रजाप्रमाणे राजवट सुरू झाली आहे. देशातील नागरिकांना संविधानाने स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले; परंतु आज केंद्रातील सरकारला संविधान मान्य नाही. ही व्यवस्था संपवण्याचे पाप केंद्र सरकार करत आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यापासून अनेक सैनिक शहीद झाले. महिलांना संरक्षण आणि सन्मान मिळत नाही. पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीमुळे जगणे मुश्‍कील बनले आहे. खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अंबानी-अदानीसारख्या मोठ्या उद्योजकांची पोटे भरणारी व्यवस्था भाजपने निर्माण केली आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ""इंग्रजाप्रमाणेच भाजपचे सरकार आहे. त्यामुळेच सध्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे. इंग्रजांविरुद्ध जे युद्ध केले, आज तिच लढाई लढावी लागेल. आज कॉंग्रेस पक्षात ज्यांनी प्रवेश केला, त्यांचे स्वागत करतो. भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये आलेल्यांनी चांगला निर्णय घेतला. भाजप देश विकायला निघाला आहे. देश विकून चालत असेल, तर तो शिल्लक राहणार काय? कष्टाने, मेहनतीने कॉंग्रेसने देश उभा केला. देश उभा करण्यासाठी अनेक नेत्यांचे योगदान आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. तो देश बरबाद करायला निघालेल्या मोदी व्यवस्थेला, भाजप व्यवस्थेला संपवण्यासाठी एकत्र यावे.'' 

यावेळी तौफीक मुलाणी, नामदेवराव मोहिते, प्रा. सिकंदर जमादार, मनीषा रोटे, वहिदा नायकवडी, नगरसेवक मनोज सरगर, अभिजित भोसले, वृषाली वाघचवरे, अण्णासो कोरे, संजय हजारे आदी उपस्थित होते. 

गटबाजी नव्हे लोकशाही
जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षात गटबाजी असल्याची तक्रार ऐकायला मिळाली; परंतु त्याला गटबाजी म्हणता येणार नाही, तर ती खऱ्या अर्थाने लोकशाही आहे. भाजप विरोधात सर्वजण निश्‍चित एकत्रित येतील. जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेस पुढे येईल, असे पटोले म्हणाले.

विशालदादांना पाडण्यासाठी सुपारी
आज विविध पक्षातून कॉंग्रेसमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करतो. आज कॉंग्रेस पक्ष पडला पाहिजे आणि ते निवडून आले पाहिजेत यासाठी काहीजण सुपारी घेतात. विशाल पाटीलही पडले नसते. परंतू त्यांना पाडण्यासाठी सुपारी घेतली गेली, असा टोला श्री. पटोले यांनी हाणला. त्याची चर्चा रंगली होती. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com