विद्यार्थ्यांनो, यंदा अॅडमिशनसाठी 'कट ऑफ' वाढणार; 'या' शाखेत प्रवेशासाठी चढाओढ!

Students_Admission
Students_Admission

पुणे : बारावीच्या निकालातील उत्तीर्णतेचा टक्का यंदा वाढला असून ७५ टक्के आणि ९० टक्क्याहून अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी, प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा 'कट ऑफ' वाढण्याची शक्यता आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयाचा कट ऑफ देखील जवळपास एक ते दोन टक्क्यांनी वाढण्याची चिन्हे आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकालात उत्तीर्णतेचा टक्का यंदा वाढला आहे. एकूण निकालात विज्ञान, वाणिज्य, कला यांसह व्यवसाय अभ्यासक्रम या चारही शाखांच्या निकालात वाढ झाली आहे. राज्य मंडळाबरोबरच सीबीएसई आणि आयसीएसई बारावीचा निकालात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी वाढण्याबरोबरच ९० टक्क्यांपेक्षा, विशेष श्रेणी (७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण) आणि प्रथम श्रेणी (६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण) पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. पुणे शहराबरोबरच पुणे विभागातही टक्केवारी वाढल्याचे दिसून येते.

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी बी.कॉम, बीबीए अभ्यासक्रमासाठी वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतात. बारावीत विज्ञान शाखेतून ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणारे विद्यार्थी देखील वाणिज्य शाखेकडे वळतात. त्यामुळे या शाखेतही चुरस वाढणार आहे. कला शाखेतही शहरातील नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी होणार चढाओढ

राज्य मंडळासह सीबीएसई, आयसीएसई बोर्डातून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि औषधनिर्माण शास्त्र अशा व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाबाबत अद्याप अनिश्चितता आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षेबाबत स्पष्टता नाही. परिणामी या अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या प्रतिक्षेत असणारे काही विद्यार्थी पारंपरिक शिक्षणाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पारंपरिक शिक्षणातील विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या प्रवेशात चढाओढ वाढण्याची शक्यता आहे.

"बारावीच्या निकालाची टक्केवारी यंदा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे. विज्ञान शाखेतून बारावीत ८०-८५ टक्के गुण मिळविलेले, तसेच ६५-७० टक्के गुण असणारे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी वाणिज्य शाखेकडे वळतात. त्यामुळे वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असणार आहे."

- चंद्रकांत रावळ, प्राचार्य, बीएमसीसी

 (Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com