यंदा ग्रामीण भागातील कॉलेजांना 'डिमांड'; पदवी प्रवेशासाठी शहर-ग्रामीण अशी होणार 'फाईट'!

Students_Admission
Students_Admission

पुणे : इयत्ता १२वीचा निकाल लागला असला तरी अद्याप नीट किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची 'सीईटी' परीक्षा पुढील दीड-दोन महिने ही परीक्षा होईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळणार असल्याने चुरस वाढणार आहे. तर, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार असल्याने ग्रामीण महाविद्यालयांचे महत्त्व वाढेल. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत नाशिक आणि नगर जिल्ह्यातील काही संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी प्राधान्य देतात. तीन जिल्ह्यात वाणिज्य शाखेच्या सुमारे ५० ते ५५ हजार, विज्ञान शाखेसाठी ३० ते ३२ हजार, तर कला शाखेच्याही सुमारे २७ ते २८ हजार जागा प्रथम वर्षासाठी उपलब्ध आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जागा ही याच प्रमाणात उपलब्ध असल्यातरी त्यांच्या प्रवेशासाठी काहीच प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश घेतील. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी घरीच राहून शिकण्यास प्राधान्य देतील त्यामुळे त्या भागातील महाविद्यालयांना चांगले दिवस येणार आहे. 

"पुणे विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यांमधील महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी सुमारे ३२ हजार जागा उपलब्ध आहेत. इंजिनियरींग, मेडिकल, हाॅटेल मॅनेजमेंट यांसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे पुण्यासह ग्रामीण भागातील महाविद्यालयात विज्ञान शाखेला चांगला प्रतिसाद असणार आहे," असे पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी सांगितले. 

स.प.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ म्हणाले, "इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे शुक्रवारपासूनच प्रथम वर्षाच्या प्रवेशाबाबतची माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. यंदाचा निकाल चांगला लागल्याने सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चुरस असेल." 

फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, "महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहे. महाराष्ट्रातून आणि राज्या बाहेरून प्रवेशासाठी चौकशी सुरू आहे, पण प्रवेश किती होतील हे पहावे लागेल."

मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव म्हणाले, "माॅडर्नने प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यात येण्याचे प्रमाण कमी होईल, पण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा न झाल्याने पारंपरिक अभ्यासक्रमास हे विद्यार्थी प्रवेश घेतील. अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर ऑनलाईन मेरिट लावून प्रवेश दिले जातील."

कटऑफ वाढणार
यंदा इयत्ता १२वीचा निकाल चांगला लागला आहे, विद्यार्थांनाही भरपूर गुण मिळाले आहेत. त्यामुळे पुण्यातील नामांकित महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार आहे. पहिल्या फेरीसाठी विविध महाविद्यालयात वाणिज्य, कला, विज्ञान शाखेसाठी किमान ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक असेल. तर, शेवटच्या फेरीसाठी ७० ते ७५ टक्के आवश्यक असणार आहेत.

पुण्यातील बहुतांश महाविद्यालये ऑनलाईन
पुण्यात लाॅकडाऊन सुरू असल्याने कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. तसेच इतर भागातील विद्यार्थीही पुण्यात येऊ शकणार नाहीत. पण फर्ग्युसन, माॅडर्न, एसपी यासह इतर महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रवेश सुरू केले आहेत. त्यावर डाॅक्युमेंट अपलोड करून प्रवेशासाठी अर्ज करता येईल. त्यानंतर महाविद्यालये गुणांची पडताळणी करून मेरीट लावणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com