
Heat Wave in Maharashtra : उष्माघाताने गाठला कळस; गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत तिप्पट वाढ
गेल्या तीन महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्रात उष्माघाताच्या २००० हून अधिक संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार, मार्च ते मे दरम्यान २,१८९ उष्माघाताची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. गेल्यावर्षी ७६७ रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत या रुग्णांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे.
गेल्या तीन महिन्यांत दररोज सरासरी २४ रुग्ण नोंदवण्यात आले. एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं की, राज्यभरातील तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे आणि बहुतेक रुग्ण ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान असलेल्या ग्रामीण भागात आढळले.
“गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावेळी जास्त रुग्ण आढळले आहेत. १६ एप्रिल रोजी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ४०० रुग्ण आढळले होते आणि १० मे रोजी सरासरी तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर ११० संशयित रुग्ण आढळले होते, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्याने दिली आहे.
आकडेवारीनुसार, राज्यात मार्चमध्ये २६४ रुग्ण आढळून आले. एप्रिलमध्ये ही संख्या ९८५ वर पोहोचली. नंतर मे महिन्यात ही संख्या ९४० पर्यंत कमी झाली. शिवाय, एप्रिलमध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ४१० रुग्ण आढळले, त्यानंतर वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक २५४ रुग्ण आढळले.
आरोग्य सेवेचे संचालक डॉ नितीन अंबाडेकर म्हणाले, “बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातून, विशेषत: विदर्भ आणि मराठवाडा विभागातील आढळून आले आहेत. पहिल्या तीन जिल्ह्यांव्यतिरिक्त, अमरावती, चंद्रपूर आणि नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण आहेत. मे मध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.”
दरम्यान, मुंबई शहरात गेल्या तीन महिन्यांत १४२ रुग्णांची नोंद झाली आहे. “मुंबईकरांना उच्च तापमानाची सवय आहे पण सध्याची परिस्थिती गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी आहे. आपल्याला उष्माघाताची प्रकरणे आढळतात परंतु फारच कमी; पण, सर्व रुग्णालयांमध्ये डीहायड्रेशन, डायरिया आणि लूज मोशनशी संबंधित रुग्ण वाढले आहेत,” ते म्हणाले.
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान 104F (40 अंश सेल्सिअस) किंवा त्यापेक्षा जास्त वाढते तेव्हा उष्माघात होतो. ही परिस्थिती उन्हाळ्याच्या महिन्यांत सर्वात सामान्य असते.