सोलापूर विद्यापीठाचा ऐतिहासिक निर्णय! नापास विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्णसाठी एक संधी वाढीव मिळणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ‘एन प्लस टू’च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. तीन वर्षांचा पदवीचा कालावधी व दोन अतिरिक्त संधीसोबतच आता विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची अतिरिक्त संधी मिळणार आहे.
solapur univercity
solapur univercitysakal

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ‘एन प्लस टू’च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तीन वर्षांचा पदवीचा कालावधी व दोन अतिरिक्त संधीसोबतच आता विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची अतिरिक्त संधी मिळणार आहे.

‘एन प्लस टू’च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक महाविद्यालये व विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदने सादर केली होती. हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठित केली.

विद्यापीठाचे कायदा अधिकारी जे. एम. खरेदी या समितीचे सचिव होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने संलग्नित ११० उच्च महाविद्यालयांना कोणतीही पदवी व पदव्युत्तर पदवी ही विहित कालावधीत म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी आणि त्यानंतर पुढील दोन वर्षाच्या अतिरिक्त संधीत पूर्ण करावी लागेल, असे पत्राद्वारे स्पष्ट केले होते. मात्र, काही विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पाच वर्षांच्या संधीतही पूर्ण करता आला नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पुन्हा पहिल्यापासून परीक्षेला बसावे लागेल, याची चिंता होती.

विद्यार्थ्यांच्या या अडचणींवर महाविद्यालयांनी विद्यापीठाला कळविले होते. कुलगुरू डॉ. कामत यांनी त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेत समिती नेमून मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दरवर्षी सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांचा फायदा

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) तसेच उच्च शिक्षणासंबंधीच्या कायद्यातील विविध अधिनियम व त्यातील अधिकार तपासून या विद्यार्थ्यांसाठी समितीने एक दिलासादायक निर्णय घेतला. त्यामुळे तळागाळातील विद्यार्थ्यांना त्या एक वर्षाच्या वाढीव मुदतीत पदवीचे राहिलेले विषय काढायची संधी मिळणार आहे. दरवर्षी सुमारे सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. समितीच्या या निर्णयाचे स्वागत प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com