मुंबई : राज्यात यंदा मान्सूनचं मे महिन्यातच आगमन झालं आहे. रविवारी रात्रीपासून राज्यभर पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. अशातच काल राज्यभरात पावसाने रौद्ररूप दाखवले होते. यामुळे काही भागात वीज खांब, झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरूच असल्याचे दिसून येत आहे. असाच पाऊस पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याचा, हवामान विभागाने इशारा दिला आहे.