नेपाळ मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचा मानसरोवर यात्रेला जाण्याचा मार्ग मोकळा
नेपाळ मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ३०० नागरिकांचा मानसरोवर यात्रेला जाण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चिनी दूतावास यांच्याकडून परमिट म्हणजेच परवाना मिळाल्यानंतर आज दुपारपर्यंत हे सर्व भाविक चिनी सीमा ओलांडणार आहेत. ४ दिवसांपूर्वी नेपाळ मध्ये महाराष्ट्राचे भाविक अडकले असल्याची बातमी सर्वात प्रथम "साम टिव्ही" ने दाखवली होती. या बातमीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतल्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला होता. परराष्ट्र मंत्रालयाकडून चिनी दूतावासाशी संवाद साधल्यानंतर आता भाविकांचा पवित्र असलेल्या मानसरोवर यात्रेचा मार्ग मोकळा झाला आहे.