Monsoon Session Updates: दोन्ही सभागृहांचं आजचं कामकाज संपलं; दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लीकवर

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Monsoon Session 2023
Monsoon Session 2023Sakal

विधानसभेचं आजचं कामकाज संपलं

एमएसपीचा मुद्दा उपस्थित करुन आमदार अशोक चव्हाण यांनी युपीए सरकार आणि सध्याच्या विद्यमान सरकारमधील तुलनात्मक कामगिरी कथन केली. त्यांनी म्हटलं की, युपीए-१, युपीए-२ या सरकारच्या काळात आणि केंद्रातील विद्यमान सरकार यांच्या काळातील गेल्या आठ वर्षातील विषय काढले तर धानच्या एमएसपीत युपीए-१च्या काळात ५१ टक्के वाढ करण्यात आली होती. तर युपीए-२च्या काळात ३७ टक्के वाढ करण्यात आली होती. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात २८ टक्के तर दुसऱ्या कार्यकाळात २० टक्के वाढ करण्यात आली. यानंतर इतर पिकांवरील त्यांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी कायम ठेवत विधानसभेचं आजचं कामकाज संपलं असल्याची घोषणा केली. त्यानंतर उद्या, २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरु होईल, असं सांगितलं.

इर्शाळवाडी दरड प्रकरणातील बचावकार्य तात्पुरतं थांबवलं

इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे बचावकार्यामध्ये अडथळे आले आहेत. कोणतेही मशीन सदर ठिकाणी पोहचू शकत नसल्यामुळे बचावकार्याचे काम संथ गतीने चालले आहे. मुख्यमंत्री स्वत: घटनास्थळी उपस्थित होते अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

धनंजय मुंडे आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये तू तू मैं मैं...

सरकारने चांगला निर्णय घेतला तर त्याचे कौतुक करायचे मोठे मन दाखवा असं कृषीमंत्री धनंजय मुंडे २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना म्हणाले. त्यानंतर भास्कर जाधव आणि त्यांच्यात तू तू मैं मैं झाले. तुमचा आवाज जरा कमी करा.. नम्रपणे सांगा, तुम्ही योजना सांगतायेत की घाबरवत आहात? असं भास्कर जाधव म्हणाले. त्यानंतर मी उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, मी मुंडे आहे. मी शेतकरी कुटुंबातून म्हणून पोट तिडकिने बोलत आहे." असं उत्तर मुंडे यांनी सभागृहात दिलं.

विधानपरिषदेचे आजचे कामकाज संपले

नीलम गोर्हे याच्या अपात्रतेबाबत तालिका सभापती निर्णय देत आहे

निरंजन डावखडे, तालिका सभापती यांनी दिलेला निर्णय

उपसभापती निलम गोर्हे यांनी शिंदेंना पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिले होते.

पक्षातरांच्या बाबतीत घेतलला आक्षेपात सभापती किंवा उपसभापती यांनी पक्षांतर केले तर ते अपात्र (निरह) ठरणार नाही. या पदाला तशी सूट ही कायद्यात देण्यात आलेली आहे. निलम गोऱ्हे यांनी ज्या पक्षाला पाठिंबा दिला तो पक्ष बदलला नाही. चिन्ह व नाव हे त्याच पक्षाचे आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निलम गोऱ्हे या कायम राहणार, त्यांनी पक्षांतर केले अशी तरतूद किंवा नियम आढळून येत नाही. म्हणून उपसभापती म्हणून गोर्हे यांचे संविधानिक तरतूदीनुसार अधिकार अबाधीत राहतील असा निर्णय तालिका सभापतींनी दिला.

293 कृषी विषयक सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर कृषी मंत्री मुंडे उत्तर देत आहे

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी २९३ अन्वये प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर या प्रस्तावावर दोन दिवस चर्चा झाली आहे. आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यावर बोलत आहेत.

प्रत्येकाने मांडलेल्या मुद्द्याचा पाठपुरावा मी करणार. कधी कोणावर काय जबाबदारी येईल याचा नेम सांगता येत नाही. काही झालं तरी आमची आपापसांत भांडण लागणार नाहीत असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.

माझे वडील शेतकरी होते , माझे काका मुंडे साहेब यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले होते, मला या देशाचे कृषीमंत्री व्हायायल आवडेल, पण दुर्दैवाने ते झालं नाही पण मला संधी मिळाली अशा शब्दांत मुंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अधिवेशन सुरुवात झाली तेव्हा हवामान वेगळं होतं. पावसाची आकडेवारी वेगळी होती. नंतर महाराष्ट्रात पाऊस आला ही शेतकऱ्यांवर पांडुरंगाची कृपा आहे. असं मुंडे म्हणाले आहेत.

ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक

महाराष्ट्रातील गायरान धारक व मुंबईतील SRA आणि BDD चाळीतील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरू... उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातही ही बैठक सुरू आहे.

सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर विधान भवनात 

पृथ्वीराज चव्हाण

जीएसटी कायद्यात प्रस्तावित बदल हा विषय PMLA कायद्या अंतर्गत आणला आहे. त्यामुळे एडी कारवाई करता येईल. यामुळे व्यापारी घाबरले असल्याचा मुद्दा पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "मी अमित शाह यांच्याकडे याबाबत सांगितले आहे. त्यांनी या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे, ते पंतप्रधानांशी बोलतील. GST कौन्सिल बैठकीत मी याबाबत मुद्दा मांडेन."

भास्कर जाधव

इर्शाळवाडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. जे कोणी यामध्ये मृत पावले असतील त्यांना श्रद्धांजली वाहतो. जे जखमी झालेत ते लवकर बरे होवोत. अश्या घटना सातत्याने घडत आहेत. १९९८ साली जांभूळ धरण फूटले होते. यावेळी शेकडो लोकं वाहून गेली होती. चिपळूण तालुक्यात तिवरे धरण फुटून २३ माणसे गेली होती. २०२१ साली सुद्धा तळीये येथे दरड कोसळली आणि आज हे झालं.

पण आता टेक्नोलॉजी फास्ट झाली आहे, त्यामुळं भूगर्भात नेमकं काय सुरु आहे याचा शोध घ्याला हवा. अशा घटना घडल्यानंतर महिना दीड महिना मदत येते पण नंतर पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून मी सातत्त्याने बोलत आहे की, सरकारने जमिनी विकत घेऊन गावात इमारात उभी करावी. ५० कुटुंबाचे पुनर्वसन करता येईल असा निर्णय सरकारने घ्यावा. असं भास्कर जाधव सभागृहात म्हणाले आहेत.

"खारघर येथील आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी भक्तांच्या मृत्यू प्रकरणी पिण्याचे पाणी आणि तिथली व्यवस्था याबाबत श्री भक्तांनी तक्रार केली नाही" असे उत्तर सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी दिले आहे.

बाळासाहेब थोरात

भाईंदर मध्ये इमारत कोसळली आहे. अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. याबाबतची वस्तुस्थिती सभागृहाने सांगावी अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली आहे.

विरोधकांचा सभात्याग

सभागृहात आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमात नागरिकांच्या झालेल्या मृत्यूवरून विरोधकांनी गोंधळ केला असून विरोधकांनी सभात्याग केला आहे.

दुर्घटनेनंतर माधव गाडगीळ समिती अहवालाचा मुद्दा उपस्थित

अशा घटना वारंवार होत असतात. तर या घटना घडू नये यासाठी माधव गाडगीळ हा अहवाल गरजेचा आहे. यातून बोध घेतला पाहिदे. माधव गाडगीळ समितीचा अहवाल पुढे आला नाही असं नाना पटोले म्हणाले. त्यानंतर त्यांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, "पश्चिम घाटासाठी गाडगीळ समिती तयार करण्यात आली होती. मी मुख्यमंत्री असताना आम्ही प्रक्रिया केली, गावांचा मॅपिंग करून हे अहवाल केंद्राला दिले, आता दोन राज्यातील अहवाल बाकी आहे."

बाळासाहेब थोरात - आम्ही स्थगन प्रस्ताव दिला होता

ज्या वेळी अश्या घटना घडतात अशावेळी आम्ही राजकारण करत नाहीत. ज्या वेळी अशी घटना घडत असतात त्यावेळी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र घेऊन घटनास्थळी जात असतात पण आम्हाला याबद्दल कल्पना दिली नाही अशी खंत बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली. त्यानंतर "ही घटना रात्री उशीरा घडल्यामुळे आम्हीसुद्धा घाईगडबडीत गेलो. परिस्थिती बिकट होती. आपला अनुभव मोठा आहे, आम्ही आपल्या सूचना स्विकारू" असं फडणवीस सभागृहात उत्तर देताना म्हणाले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानपरिषदेत माहिती

या घटनेसंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात दिली आहे, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

९८ जणांना वाचवण्यात यश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून इर्शाळवाडी दुर्घटनेसंदर्भात सभागृहात माहिती

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील दरड कोसळल्याची माहिती देवेंद्र फडणीसांनी सभागृहात दिली. रात्री १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून आत्तापर्यंत ९८ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. या मदतकार्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे बराच वेळ चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

"ही दुर्दैवी घटना घडली असून गिरीश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रीपासून घटनास्थळी आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बचावकार्यामध्ये अडथळे येत आहेत. जेसीबी जात नसल्यामुळे दोन ते अडीच टन वजनाचा जेसीबी एअरलिफ्ट करता येईल का असा विचार प्रशासन करत आहे. तर मुख्यमंत्री स्वत: घटनास्थळी असून ते वेगवेगळ्या एजन्सीच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर दादा भुसे, उदय सामंत, स्थानिक आमदार तिथे उपस्थित असून ते नातेवाईकांना आधार देत आहेत." असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

विरोधक दुर्घटनेमुळे आंदोलन करणार नाहीत

रायगड येथील दुर्घटनेमध्ये जिवीतहानी झाल्यामुळे विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यावर आज आंदोलन करणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

इर्शाळवाडी दुर्घटनेत ७ मृत्यू १७८ अडकले

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून मातीच्या ढिगाऱ्याखाली १७८ जण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. बचावपथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल

देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल झाले असून त्यांनी यावेळी इर्शाळवाडी दरड कोसळ्याच्या घटनेचा आढावा घेतला आहे. मंत्रिमंडळातील सहकारी घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

अधिवेशनाचा चौथा दिवस

पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. काल रात्री रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून ८० जणांना वाचव्याची माहिती समोर आली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, दादा भुसे घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. कंट्रोल रूममधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com