मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
रायगड जिल्ह्यात तळई मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.
महाराष्ट्रात पावसाने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी विविध घटना घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यात हाहा:कार माजला असून तळई गावांत तब्बल ३६ जणांचा बळी गेल्याची घटना घडली. रायगडच्या महाडमध्ये आणि कोकणच्या चिपळूणमध्ये पूराची स्थिती उद्भवल्याने अनेक जण आपापल्या घरात अडकले. अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली गेली आहेत. तसेच, गुरूवारी रात्री पोलादपूर हद्दीतही दरड कोसळून ११ जणांचा बळी गेला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.