राज्यात येणार महायुतीचे सरकार - देवेंद्र फडणवीस

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

मुंबई - आपण महायुती म्हणून मते मागितली, लोकांना सामोरे गेलो, लोकांनी बहुमताने निवडून दिले आणि आता राज्यात महायुतीचेच सरकार येणार आहे यात शंका घेण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

विधानभवनातील भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात झालेल्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. या वेळी भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार, भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी या वेळी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा यांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही आभार मानले. ते म्हणाले, ‘‘महायुती म्हणून निवडणूक लढलो. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार मानतो. सत्तास्थापनात शंकेचे कुठलेही कारण नाही. ज्यांना शंका घ्यायची आहे ते चर्चा करत आहेत.’’

फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांत सरकारने उत्तम काम केले. मात्र सर्वच आम्ही केले आणि ते झाले असा आमचा दावा नाही. राहिलेली कामे पुढच्या पाच वर्षांत पूर्ण करणार आहोत. सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांनी भाजपला मतदान केले आहे.’’ सर्वच वर्गांचे प्रतिनिधित्व भाजपमध्ये आहे, त्यामुळे भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष ठरला असल्याचे ते म्हणाले. विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला आणि विविध पक्षांच्या १० आमदारांनी त्याला अनुमोदन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com