खासदार अमोल कोल्हे यांनी 7 नोव्हेंबरला आपण आता एकांतवासात जाणार अशा आशयाची पोस्ट शेयर केली होती. त्यावरुन त्यांनी आता सोशल मीडियावरुन आपल्या मतदार, चाहत्यांशी संवाद साधला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी जेव्हा एकांतवासाची पोस्ट शेयर केली त्यानंतर चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर अनेकांनी वेगवेगळया प्रकारचे अंदाज व्यक्त केले. म्हणून आपणच याप्रकरणाचा उलगडा करावा. या पोस्टच्या निमित्तानं मी अनेक गोष्टींचा विचार केला आहे. काही जणांनी माझ्याप्रती सहानुभूती दर्शवली तर काहींनी मला सहमती दाखवली, काहींनी तर राजकीय संन्यासाची आणि पक्षांतरापर्यत मजल मारली...
काही राजकीय विश्लेषकांनी देखील माझ्या पक्षांतराची चर्चा सुरु केली. मात्र याबद्दल काय बोलावं हे कळेना. दरम्यान मला खूप काही शिकायला मिळाले. काही गोष्टींची नव्यानं जाणीवही झाली. म्हणून आपणच आज या गोष्टीवरुन पडदा उचलावा यासाठी आपल्याशी संवाद साधतो आहे. चाहत्यांच्या प्रतिक्रियांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. चाहत्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यातून गरज निर्माण झाली ती मानसिक जाणीवेची. तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तीला येणारा मानसिक थकवा मला सर्वात महत्वाची गोष्ट वाटते. याचे कारण आपण काही दुर्देवी बातम्या ऐकतो की, तिशीतल्या तरुणाचे हदयविकारानं निधन, ऐन पस्तीशीत मधुमेहाची सुरुवात अशा अनेक कानावर आदळत असतात.
अनेक आजारांचे कारण मानसिक तणाव हे आहे. केवळ लोकप्रतिनिधी आणि कलाकार म्हणून नाहीतर एक डॉक्टर म्हणून मी सांगतो आहे. असे कोल्हे व्यक्त झाले आहेत. पुढे ते म्हणतात, स्वप्न, महत्वाकांक्षा आणि गरज यांच्यामुळे अनेक सीमारेषा पुसट होऊ लागल्या आहेत. आता प्रत्येकजण धावू लागला आहे. धावताना माणूस एक गोष्ट विसरला ती म्हणजे तो नेमका का धावतो आहे. केवळ तो धावताना थांबला तर लोकं आपल्याला काय म्हणतील या भीतीपोटी तो धावतोय का...याचं उत्तर आपण शोधायला हवं. यासगळ्यात आपल्या मनाचे काय? हे सगळ्यात महत्वाचे आहे. ग्रामीण भागातून शहरात स्थायिक झालेल्या तरुणाईला हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे. आपण आपलं मन मोकळं करायचं कुठं, हा प्रश्न आहे. म्हणून सांगतो व्यक्त व्हा....मोकळे व्हा...कुणी आपल्याला काहीही म्हणो...
माझी एक प्रामाणिक भावना आहे ती म्हणजे, मानसिक थकवा स्विकारण्यापासून तो दूर करण्याच्या प्रामाणिक भावनेतून होणारा एक मृत्यु जरी वाचला तरी यासगळ्याचे चीज झाले असे मी म्हणेल. मी एकांतवासातून काय विचार केला हे येत्या दिवसांत समजेलच. माझ्या मित्रांनी मावळत्या सूर्याचा असा उल्लेख केला. प्रत्यक्षात तो उगवतीचा सूर्य असा आहे. आपली वैचारिक बैठक पक्की व्हावी यासाठीचा हा एकांतवास आहे. आता मी पुन्हा एका वेगळ्या भूमिकेतून तुम्हा सर्वांसमोर येणार आहे. त्यासाठी मी सज्ज आहे. असंही कोल्हे यांनी सांगितले. आता आपल्याला व्यक्त होण्याचे नवे माध्यम सापडले आहे. त्यासाठी आपण अमोल ते अनमोल नावाचे चॅनेल सुरु केले आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.