मुंबई : कोळशाच्या टंचाईमुळे (coal scarcity) महावितरणला (MSEB) वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील (thermal power Generation) १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल तीन हजार ३३० मेगावॉट विजेचा पुरवठा (electricity stops) ठप्प झाला आहे. राज्यात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून ग्राहकांनी मागणी (consumer demands) व उपलब्धतेत समतोल राखण्यासाठी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले.
देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक येथील प्रत्येकी २१० मेगावॉट, अकोला येथील पारस २५० मेगावॉट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील प्रत्येकी ५०० मेगावॉटचा एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॉटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेड अमरावती येथील ८१० मेगावॉटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.
विजेच्या मागणी व उपलब्धतेतील सध्या ३ हजार ३३० मेगावॉटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून वीजखरेदी सुरू आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीजखरेदीचे दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून ७०० मेगावॉट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे, तर आज सकाळी रियल टाईम व्यवहारातून ९०० मेगावॉट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघू जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.
कृषिवाहिन्यांना आठ तास वीजपुरवठा
कोळसाटंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणीदेखील वाढली आहे. राज्यात (मुंबई वगळून) शनिवारी (ता. ९) १७ हजार २८९ मेगावॉट विजेचा मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला; तर गेल्या २४ तासांमध्ये राज्याच्या काही भागात पावसामुळे रविवारी (ता. १०) विजेच्या मागणीत घट झाली. रविवारी (ता. १०) सकाळी ११.३० वाजता राज्यात १८ हजार २०० मेगावॉट, तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात १५ हजार ८०० मेगावॉट विजेची मागणी होती. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर दररोज आठ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.
काटकसर करण्याचे आवाहन
कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.