Sharad Pawar : पवारांचं राजीनामा अस्त्र; एका खेळीत शिंदेंच बंड मोडून निघालं अन् राजीव गांधींना शिकवला धडा

विरोधकांच्या दोन पावले पुढे राहून धक्कादायक निर्णय घेणारे शरद पवार कधी कधी स्वकीयांना देखील कात्रजचा घाट दाखवतात.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखलं जातं. नुकताच त्यांनी वयोमानाचे कारण देत आपल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यामागे देखील पवारांची राजकीय खेळी असल्याचं बोललं जातं. विरोधकांच्या दोन पावले पुढे राहून धक्कादायक निर्णय घेणारे शरद पवार कधी कधी स्वकीयांना देखील कात्रजचा घाट दाखवतात. (ncp leader Sharad Pawar resignation how pawar taught a lesson to congress leader rajiv gandhi )

असाच एक किस्सा इतिहासात घडलेला

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातील. शरद पवार हे आपला पक्ष विसर्जित करून कॉंग्रेस मध्ये परतले होते. त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं होतं. त्याकाळात कॉंग्रेसची कमान राजीव गांधी यांच्याकडे होती. तर पंतप्रधानपदी जनता दलाचे चंद्रशेखर हे होते. केंद्रातील या सरकारला कॉंग्रेसचा पाठिंबा होता मात्र तरीही राजीव गांधी आणि चंद्रशेखर यांच्यातील संबंध ताणलेले होते.

शरद पवार यांचे या दोन्ही नेत्यांशी चांगले संबंध होते. राजीव गांधी हे पवारांना समवयस्क असल्यामुळे दोघांच्यात मैत्रीचे नाते होते आणि चंद्रशेखर यांच्याशी तर खूप पूर्वी पासून पवारांचे अगदी कौटुंबिक संबंध होते. याच संबंधामुळे चंद्रशेखर पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या शपथविधी दिवशी पवारांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांची अगदी वाजत गाजत भोजन समारंभ आयोजित केला होता.

Sharad Pawar
Sharad Pawar Resigns: "खर्गेंनी शरद पवारांचा आदर्श घ्यावा", निलंबित काँग्रेस नेत्याचं विधान

पंतप्रधान चंद्रशेखर अनेकदा मुंबईत आल्यावर पवारांच्या वर्षा बंगल्यावर यायचे. यातूनच कॉंग्रेस श्रेष्ठींच्या मनात पवारांच्या बद्दल गैरसमज निर्माण होण्यास सुरवात झाली. पवारांनी याबद्दल आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात सांगितलं आहे. त्यात ते सांगतात,

"14 जानेवारी मकरसंक्रातीच्या दिवशी अस्वस्थतेला मुंबईतच तोंड फुटलं. माझ्या विरोधात शिवाजीराव देशमुख, रामराव आदिक, विलासराव देशमुख, जवाहरलाल दर्डा, सुरूपसिंग नाईक आणि जावेदखान या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या जोडीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुशीलकमार शिंदे, शंकरराव चव्हाण, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, बॅ. ए. आर. अंतुले हेही उपस्थित होते."

शरद पवार यांची मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी केली नाही, तर महाराष्ट्रात कॉंग्रेस अडचणीत येईल. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करावं, किंवा त्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

राजीनाम्याचं प्रकरण वरवर दिसतं तेवढं साधं नाही, याचा पवारांना लगेचच अंदाज आला, याचं एक कारण म्हणजे, हे सारे मंत्री रोजच पत्रकार परिषदा घेऊ लागले. दिल्लीतून सूत्रं हलवली जाताहेत, हेही पवारांच्या लक्षात आलं. अन्यथा, मुख्यमंत्र्याविरुद्ध उघड भूमिका घेण्याची हिंमत ते करूच शकले नसते. विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवा' अशी सूचना मला करण्यात आली.

Sharad Pawar
Supriya Sule : पहिल्या नजरेत भावली पवारांची लेक, वाचा सदानंद अन् सुप्रिया सुळेंची लव्हस्टोरी

'काँग्रेस'च्या पद्धतीप्रमाणे 'अखिल भारतीय कांग्रेस महासमिती'चे दोन निरीक्षक जी. के. मूपणणार आणि गुलाम नबी आझाद यांना आमदारांची मतं जाणून घेण्यासाठी पाठवण्यात आलं. शरद पवारांच्या बाजूनं या वेळी सर्वाधिक आक्रमक आणि उघड भूमिका सुधाकरराव नाईकांनी घेतली. "तुम्ही अजिबात राजीनामा द्यायचा नाही, माघार घ्यायची नाही. आपण शक्तिप्रदर्शन करायचं!" असे सुधाकररावांनी पवारांना बजावलंच.

कॉंग्रेसच्या निरीक्षकांनी विधिमंडळाची बैठक बोलावली, मात्र या बैठकांचा रागरंग पाहून गुलाम नबी आझाद आणि मुपणणार यांनी 'नेतृत्वबदल या विषयावर चर्चा होणार नाही. प्रत्येक आमदाराशी आम्ही व्यक्तिगत बोलणार आहोत', असे स्पष्ट केल. या व्यक्तिगत बैठकीमध्ये देखील आमदारांनी पवारांनाच पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. हा कल लक्षात येताच दिल्लीमधल्या मंडळीना धक्काच बसला.

शरद पवारांना दोनच दिवसांत माखनलाल फोतेदारांचा फोन आला. राजीव गांधीना तुमच्याशी बोलायचं असल्याचा त्यांनी निरोप दिला. शरद पवार दिल्लीला राजीवजींना भेटले. गेल्या गेल्या त्यांनी पहिलाच प्रश्न केला,

"मुंबईत काय चाललंय?

शरद पवार उत्तरले, "माझ्यापेक्षा तुम्हाला याची जास्त कल्पना आहे.”

त्यावर हसत हसत राजीव गांधीनी विचारल, 'मला कशी असणार?"

शरद पवार त्यावर परत उत्तरले,

"सर्व कारवायांचं मूळ इथेच तर आहे."

यावर परत राजीव गांधी खळाळून हसले आणि म्हणाले,

“झाड नुसतं हलवा, मुळापासून उखडून टाकू नका असं मी त्यांना सांगितलं होतं.'

Sharad Pawar
Sharad Pawar Resign : निर्णय मागे घ्यावा; पदाधिकारी, आमदार, कार्यकर्ते आक्रमक

शरद पवार संयमित पण परखड बोलायचं असं ठरवूनच आले होते. पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर राजीव गांधींनी नरमाईची भाषा सुरू केली, झालं गेलं ते बाजूला ठेवूया. पण मंत्रिमंडळात काही बदल करावे लागतील. असं त्यांनी पवारांना सांगितलं.

शरद पवारांनी त्यांना स्पष्ट सांगितलं,

"मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मीच पार पाडायची असेल, तर मंत्रिमंडळातल्या बदलांबाबतही मीच निर्णय घेईन. सुशीलकुमार शिंदे यांना माझ्या मंत्रिमंडळात मी अजिबात स्थान देणार नाही. त्यांना राजकारणात मीच आणलेलं आहे. त्यांच्या मनात माझ्याविषयी विरोध नाही, याचीही मला कल्पना आहे. दिल्लीतून तुम्ही दिलेल्या सूचनांची केवळ ते अंमलबजावणी करत होते, पण पक्षाचा अध्यक्ष स्वपक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बिनदिक्कत रोज उघडपणे बोलत असेल, तर मी ते खपवून घेणार नाही."

यावर राजीव गांधी यांचा या निर्णयाला विरोध होता. मात्र शरद पवारांनी आपले राजीनामा अस्त्र बाहेर काढले यामुळे शेवटी राजीव गांधी यांना मॅन झुकवावी लागली आणि सुशीलकुमार शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्यात आलं.

शरद पवार आपल्या आत्मचरित्रात सांगतात,

काही दिवसांनी विलासराव देशमुख माझ्याकडे येऊन म्हणाले, “मी पुन्हा असं करणार नाही." ही घटना राजकीय होती आणि मी तत्क्षणी त्यावर पडदा टाकला. विलासरावांचे आणि माझे वैयक्तिक-कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे होतेच, ते पुढेही तसेच कायम राहिले. मला आठवतं, बंड केलेल्यांपैकी काहीजणांनी नंतर माझ्याकडे येऊन दिल्लीतल्या नेत्यांविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. 'ते आमचा वापर करतात आणि तोंडघशी पाडतात', अशा भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केल्या. माझ्यासाठी ते प्रकरण संपलं होतं. कटुता वाढवण्यात मलाही रस नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com