राज्यातील ५९७ नर्सेसच्या नोकरीवर गदा; ३१ ऑगस्टला सेवा समाप्त

राज्यातील ५९७ नर्सेसच्या नोकरीवर गदा; ३१ ऑगस्टला सेवा समाप्त
Updated on

यवतमाळ : कोविडच्या दुसऱ्या लाटेत रिक्तपदामुळे आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले. नागरिकांना उपचारासाठी वणवण भटकंती करावी लागली. एकीकडे आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत राज्यातील तब्बल ५९७ कंत्राटी नर्सेसच्या (एएनएम) नोकरीवर गदा आली आहे. त्यांची सेवा ३१ ऑगस्टनंतर रद्द केली जाणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत कार्यरत कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी नर्सेस (एएनएम) दहा ते पंधरा वर्षांपासून कार्यरत आहेत. कोरोना काळात त्यांनी ग्रामीण भागातील जनतेला रजा न घेता सेवा दिली. त्यांच्या कामाचे कौतुक करायचे सोडून चक्क घरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अंमलबजावणी आराखड्यामध्ये नर्सिंग कार्यक्रमासाठी बिगर आदिवासी क्षेत्रासाठी ३,२०७ एएनएमची पदे मंजुरीसाठी केंद्र शासनास प्रस्तावित करण्यात आली होती.

त्यात प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात ५९७ पदांना मंजुरी व वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे ५९७ पदांना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिक्त पदे रद्द करूनही रद्द करावयाची पदे शिल्लक असल्यास एक वर्षांत एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील आरोग्य सेविकेची पदे रद्द करावीत, एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्राची संख्या रद्द होणाऱ्या पदापेक्षा जास्त असल्यास २०११ च्या जनगणनेनुसार यादी तयार करावी, त्यातील कमीत कमी लोकसंख्या असलेल्या उपकेंद्राची पदे रद्द करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

३१ ऑगस्टनंतर रद्द केलेल्या पदांचे वेतन अदा करण्यात येणार नाही, याची दक्षता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकांना घ्यावी लागणार आहे. एएनएमला काम करण्याची इच्छा असल्यास अर्ज करावा लागणार आहे. समुपदेशनाने रिक्त पदे भरण्यात येतील. दहा सप्टेंबरपर्यंत प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करून विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक सेवाज्येष्ठतेनुसार राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान अंतर्गत नेमणूक देतील.

जिल्हानिहाय संख्या

ठाणे - ३, रायगड - 21, पालघर - १, नाशिक - १०, जळगाव -19, अहमदनगर - 29, पुणे - 19, सोलापूर - 39, सातारा - 29, कोल्हापूर - 39, सांगली - 23, सिंधुदर्ग - 21, रत्नागिरी - 19, औरंगाबाद - ८, जालना - १०, हिंगोली - 12, परभणी - 19, लातूर - 22, उस्मानाबाद - 16, बीड - 30, नांदेड - 37, अकोला - 13, अमरावती - 13, बुलडाणा - 24, वाशीम - 9, यवतमाळ - 21, नागपूर - 24, वर्धा - 22, भंडारा - 11, चंद्रपूर - 11 अशी आहेत.

नियमित पदे रिक्त असताना दहा ते पंधरा वर्षांपासून कार्यरत एएनएमला कामावरून कमी करण्याचा निर्णय चुकीचा आहे. लसीकरण सुरू आहे. शंभर आरोग्य विषयक कामे राबविण्यात येत आहे. कमी होणारे कर्मचारी गैर आदिवासी भागातील आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या आदिवासी भागाचे नेतृत्व करतात. केंद्रीय राज्यमंत्र्यांना वादात अडकविण्याचा डाव आहे. मंत्र्यांनी हस्तक्षेप करून नर्सेस कमी करण्याची कारवाई विनाविलंब थांबवावी.
- अशोक जयसिंगपुरे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य नर्सेस आरोग्य कर्मचारी संघटना, यवतमाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com