आचारसंहितेत अडकणार पोलिस भरती! शासन निर्णय निघून २ महिने होऊनही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू नाही; ‘गृह’ विभागाकडून नाही अंतिम मान्यता

गृह विभागाने २० ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून १५ हजार ६३१ पोलिस शिपायांची भरती करण्याचे जाहीर केले. शासन निर्णय निघून दोन महिने उलटले, तरी अद्याप अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. गृह विभागाकडून भरतीस अंतिम मान्यताच मिळाली नसल्याची बाब आता पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस भरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे.
solapur
police bharatisakal news
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : गृह विभागाने २० ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून १५ हजार ६३१ पोलिस शिपायांची भरती करण्याचे जाहीर केले. शासन निर्णय निघून दोन महिने उलटले, तरी अद्याप अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. गृह विभागाकडून भरतीस अंतिम मान्यताच मिळाली नसल्याची बाब आता पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस भरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे.

राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस शिपायांची पदे भरण्यात येणार आहेत. शहर-जिल्ह्यांचा विस्तार व लोकसंख्येतील वाढ आणि गुन्ह्यांची वाढलेली संख्या, या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरेच आहे. त्यामुळे पोलिस दलातील रिक्त होणारी १०० टक्के पदे वेळोवेळी भरली जातात. गणेशोत्सवानंतर पोलिस भरतीस प्रारंभ होईल, असे प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. ऑगस्टमध्ये पोलिस भरतीचा शासन निर्णय निघाल्याने तरुण-तरुणींना मोठा आनंद झाला होता.

मात्र, ऑक्टोबर संपतोय तरीदेखील पोलिस भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली नाही. गृह विभागाच्या अंतिम मान्यतेनंतर भरतीची प्रक्रिया पुढे सुरू होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. त्यानंतर दोन ते तीन टप्प्यात जानेवारीपर्यंत या निवडणुका चालणार आहेत. त्यामुळे पोलिस भरती आचारसंहिता संपल्यावर ऐन उन्हाळ्यात (पहिल्यांदा मैदानी चाचणी घेतली जाते) सुरू होईल की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

अशी आहेत भरतीची पदे

  • पोलिस शिपाई : १२,३९९

  • चालक : २३४

  • बॅण्डसमन : २५

  • सशस्त्र पोलिस शिपाई : २,३९३

  • कारागृह शिपाई : ५८०

  • एकूण : १५,६३१

वयोमर्यादा वाढविलेले उमेदवार थकले

राज्य सरकारने आगामी पोलिस भरतीच्या अनुषंगाने २०२२ ते २०२५ पर्यंत वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांसाठी मोठा निर्णय घेतला. गृह विभागाच्या निर्णयानुसार वयोमर्यादा संपल्यामुळे पोलिस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी आहे. आता ते तरुण-तरुणी भरतीचा सराव करून थकले, पण भरती प्रक्रिया अजून सुरू होऊ शकलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com