‘पद्मश्री’ मिळाला; पण रस्ते, पाणी कुठेय?

बीजमाता राहीबाई पोपेरे यांची खंत
Rahibai Popere
Rahibai Poperesakal

नवी दिल्ली : पद्मश्री हा पुरस्कार खूप मोठा आहे. हा किताब मिळाला, याचा आनंद आहे. परंतु नगर जिल्ह्यातील माझा अकोले तालुका आणि या तालुक्यातील माझे गाव कोंभाळणे येथे दरवर्षी पाण्याची टंचाई आणि रस्त्यांची दुर्दशा कायम आहे, अशी खंत ‘पद्मश्री’ विजेत्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राहीबाई यांना दिल्लीत पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासाठी त्या दिल्लीत आल्या आहेत. त्या मूळच्या नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील असून, ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. ‘‘सरकारकडे मी कोणतीच गोष्ट माझ्यासाठी मागत नाही. आम्ही जतन केलेली बियाणे ही समाजाची संपत्ती आहे, ती जपण्यासाठीच माझे सरकारकडे मागणे असते. या बियाणांच्या बँकेसाठी इमारत झाली आहे. परंतु शास्त्रीय पद्धतीने त्याचे जतन झाले पाहिजे, यासाठी सरकारकडून काही मिळालेले नाही,’’ असे त्या म्हणाल्या.

Rahibai Popere
मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वीच अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या...

पाण्याची सुविधा हवी

आमची मदार पावसावर अवलंबून असते. जेवढे पावसामुळे पिकेल, तेवढेच पीक आम्हाला घेता येते. पिकांसाठी पाण्याची सुविधा झाली, तर उन्हाळ्यातही चांगली पीक घेता येतील. चार-सहा महिने पाऊस आला, तेवढेच पीक मिळते. उन्हाळ्यात मात्र पिण्याच्या पाण्यासाठी देखील हाल सोसावे लागतात. या काळात टँकरने पिण्याचे पाणी घ्यावे लागते. हा प्रश्‍न सोडविला, तर आमचे कामही आणखी वाढेल. आमच्याकडे लोक येत राहतील आणि समाजालाही त्यातून प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षाही राहीबाई यांनी व्यक्त केली. या वेळी राहीबाई यांनी रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल खंत व्यक्त केली.

काळ्या मातीचा पुरस्कार

तुम्ही जतन केलेल्या बियाणांचे शास्त्रीय पद्धतीने संर्वधन करण्यासाठी केंद्र वा राज्य सरकारकडून मदत मिळाली का, या प्रश्‍नावर अशी कोणतीही मदत मिळाली नसल्याचे राहीबाई यांनी सांगितले. आमची खरी गरज ही पाणी आहे. पाणी मुबलक असेल, तर कितीतरी चांगले पिक आम्ही घेऊ शकतो. त्यातून आणखी बीज संवर्धनालाही चालना मिळेल. मला मिळणारा प्रत्येक पुरस्कार हा पहिला त्या काळ्या मातीचा आहे. त्यानंतर समाजाचा आणि माझा आहे, अशी भावना राहीबाई यांनी व्यक्त केली.

Rahibai Popere
Farmers Protest: 29 नोव्हेंबरला शेतकरी संसदेकडे कूच करणार

आमच्या तालुक्यात चांगले रस्ते नाहीत. बीजबँक पाहण्यासाठी लोकांना जीव मुठीत धरून यावे लागते. पद्मश्री पुरस्कार खूप मोठा आहे. पण मला लोक नेहमी म्हणतात, की रस्त्यांबाबत तुम्ही सरकारला का नाही सांगत? आम्ही तिथे टिकाव-फावडे घेऊन रस्ते करायचे का? हे काम सरकारनेच करायला हवे. अशा परिस्थितीतही मी एक समाजसेवा म्हणून काम करते आहे.

- राहीबाई पोपेरे, ‘पद्मश्री’विजेत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com