रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. खालापूर परिसरामध्ये अद्याप मुसळधार पाऊस सुरू आहे. एनडीआरएफसह इतर बचाव पथकांना मदतकार्य करताना मोठ्या अडचणी येत आहेत. तर या दुर्घटनेत १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक जण पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)
दरम्यान, या घटनेने राज्य हादरलं असतानाच मनसेने या दुर्घटनेसंबधीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मनसेने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेल्या महिन्यातील एका भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरती शेअर केला आहे. गेल्या महिन्यामध्ये कोकण दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात कोकणात पावसाळ्यात दरडी कोसळतील, त्यामुळे प्रशासनाने सजग असावं असा इशारा आपल्या भाषणात दिला होता.(Latest Marathi News)
मनसेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ११ जून २०२३ रोजी राज ठाकरे यांनी सांगितलं होतं, यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील असं दिसतंय, शासन-प्रशासनाने जागृत राहावं. २० जुलै २०२३ रोजी रायगडच्या इर्शाळवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव जमीनदोस्त होणं, माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी आहे.(Latest Marathi News)
तर या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांनी म्हंटलं होतं की, 'महाराष्ट्र सरकारनं अशा नैसर्गिक दुर्घटनेत आपली माणसं मृत्युमुखी पडू नयेत म्हणून उपाययोजना करणं गरजेचं आहे. डोंगरपायथ्याशी असणाऱ्या वाडी-वस्तीचं पुनर्वसन कार्य हाती घ्यावं, पर्यावरण तज्ञांचा सल्ला घेऊन एक 'पुनर्वसन योजना' आणि डोंगरपायथ्याशी वस्ती असू नये किंवा बांधली जात असेल तर ती किती अंतरावर असावी याबाबत योजना आखावी.'(Latest Marathi News)