Raksha Bandhan History: रक्षाबंधनाची सुरवात कशी झाली? पुराणकाळापासून महाभारतापर्यंत आहेत अनेक मान्यता

भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याची दोर म्हणजेच रक्षाबंधन
Raksha Bandhan History
Raksha Bandhan Historyesakal

Raksha Bandhan Festival : भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. प्रदेशागणिक कहाण्या बदलल्या तरी आपल्या माणसाला प्रेमाच्या रेशीमबंधांनी जखडून ठेवायचे, ही कल्पना मात्र सगळीकडे समान आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

राखी बांधताना बहिणीने म्हणावे – येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल॥ राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोमन प्रार्थना करते.

भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याची दोर म्हणजेच रक्षाबंधन. चातुर्मासातील पहिला महिना म्हणजेच श्रावण. श्रावण सुरू होताच वेध लागतात ते रक्षाबंधनाचे. रंगीबेरंगी राख्यांनी बाजारपेठा फुलून जातात. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. रक्षाबंधनासंदर्भात उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्येही आढळून येतो.

रक्षाबंधनाची सुरुवात सतयुगापासून झाली, असा दावा केला जातो. त्याचबरोबर रक्षाबंधनाला पुराणकाळात नेमके काय म्हटले जायचे? आणि रक्षाबंधनाची सुरुवात साधारण कधीपासून झाली? पुराणात या संदर्भात कोणकोणत्या कथा आढळतात? ते जाणून घेऊ

रक्षासूत्र

राखी म्हणजेच रक्षाला पूर्वीच्या काळी 'रक्षासूत्र' म्हटले जात होते. रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे. हे संरक्षण सूत्र नंतर नवरा बायको, आई-मूल आणि नंतर भाऊ बहिण यांच्या प्रेमाचे प्रतीक बनले. तर रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात. जे वेदातील संस्कृत शब्द 'रक्षिका' या शब्दाचा अपभ्रंश आहे

. मध्यकाळात याला राखी म्हटले जाऊ लागले, असे सांगितले जाते. देशाच्या प्रत्येक भागात याला वेगवेगळे नाव आहे. दक्षिण भारतात नारळी पूर्णिमा, बलेव आणि अवनी अवित्तम, तर राजस्थानमध्ये रामराखी आणि चुडाराखी म्हटले जाते.

गणेशाला प्रथम राखी

श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनासंदर्भात अनेक मान्यता आहेत. देशाच्या काही भागात याला गुरु-शिष्य परंपरेचे प्रतीक मानले जाते. राजा दशरथ आणि श्रावण बाळ भेट प्रसंगाशीही रक्षाबंधनाचा संबंध जोडला जातो.

प्रथमेश असलेल्या गणपतीला प्रथम राखी अर्पण करावी, असे मानले जाते. यानंतर श्रावण बाळाच्या नावाने एक राखी काढून ठेवावी आणि त्याला ती समर्पित करावी. याशिवाय आपल्याला प्राणवायू देणाऱ्या वृक्षांनाही आपण एक राखी बांधू शकतो.

Raksha Bandhan History
Raksha Bandhan: बहिणीला काय गिफ्ट देताय? सलमानने अर्पिताला १५० एकरचं फार्महाऊस दिलेलं

महाभारतातील रक्षाबंधन

रक्षाबंधनाशी संबंधित महाभारतकालीन गोष्ट सांगितली जाते. एकदा भगवान श्रीकृष्णाच्या हाताला दुखापत झाली आणि रक्तस्राव होऊ लागला. द्रौपदीने साडीच्या पदराचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. यामुळे रक्तस्राव थांबला.

कालांतराने जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णानेच वस्त्र वाढवून या बंधनाचे ऋण फेडले, असे सांगितले जाते. याशिवाय पांडवांचा विजय निश्चित करण्यासाठी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला रक्षाबंधन साजरे करावे, असे सल्ला दिला होता, अशी आख्यायिका आहे.

​शची देवीचे रक्षाबंधन

देव आणि दानव यांच्यामध्ये जेव्हा युद्ध सुरू झाले आणि दानव देवांवर आधिपत्य गाजवू लागले, तेव्हा देवतांचा पराभव होत असल्याचे पाहून देवराज इंद्र ऋषी बृहस्पतींकडे गेले. तेव्हा बृहस्पतींच्या सांगण्यावरून इंद्राची पत्नी इंद्राणी म्हणजेच शचीने एक रेशीम धागा बांधला.

परिणामी इंद्र विजयी झाले. योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तेव्हापासूनच युद्धात विजयी होण्यासाठी पतीला रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते.

लक्ष्मी देवी आणि रक्षाबंधन

स्कंदपुराण, पद्मपुराण आणि श्रीमद्भागवतेनुसार, श्रीविष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बलिकडे तीन पाऊले जमीन मागितली. त्यावेळी राजा बलीनेही भगवंतांकडून दिवस-रात्र आपल्यासमोर राहण्याचे वचन घेतले.

वामनावतारानंतर श्रीविष्णूंना पुन्हा लक्ष्मी देवीकडे जायचे होते. पण श्रीविष्णू वचनात बांधले गेल्यामुळे पातालात राहून बलीच्या सेवेत राहू लागले. अनेक दिवस झाले, तरी श्रीविष्णू लक्ष्मीकडे परतले नाही म्हटल्यावर लक्ष्मी देवी काळजीत पडल्या.

नारदाने लक्ष्मी देवींना एक उपाय सांगितला. तेव्हा लक्ष्मी देवीने राजा बलीला राखी बांधून आपले भाऊ बनविले. श्रीविष्णूंना आपल्यासोबत नेण्याचे वचन बली राजाकडून लक्ष्मी देवीने मागितले. तसेच वर्षातील चार महिने श्रीविष्णू पाताळात येऊन आपल्याला दिलेल्या वचनाचा मान ठेवतील, असेही लक्ष्मी देवींनी बली राजाला सांगितले.

हाच कालावधी चातुर्मास म्हणून साजरा केला जातो. लक्ष्मी देवींनी राजा बलीला रक्षासूत्र बांधले, तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमा होता.

Raksha Bandhan History
Raksha Bandhan: अजित पवारांच्या पहिल्या निकालाच्या दिवशी सुप्रियाताईंनी केला होता उपवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com