
अखेर रामदास कदमांचा पत्ता कट; पक्षाकडून 'या' उमेदवाराला संधी
राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांसाठी लगबग सुरू झाली असून, सर्व पक्षांनी उमेदवारांची शोधाशोध सूरू केली आहे. या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेचा मुंबईतून उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ही जागा मिळणार की नाही? त्यांना डावललं जाणार का? अशा चर्चा सुरू असतानाच आज शिवसेनेनं अखेर उमेदवारी जाहीर केली असून, रामदास कदम यांचा पत्ता कट करून एका वेगळ्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.
रामदास कदम यांनी मागच्या काळात अनिल परब यांना अडचणीत आणण्यासाठी किरीट सोमय्याना मदत केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता. त्यावरूनच त्यांच्यावर पक्ष नाराज असून, गेल्या काही काळापासून ते पक्षापासून दूर असल्याचं दिसत होते. त्यानंतर आता पक्षाने विधानपरिषदेच्या निवडणुकीतून देखील त्यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांच्या ऐवदी शिवसेनेच्या सुनील शिंदे यांना पक्षाने संधी द्यायचे ठरवले आहे.
सुनील शिंदेच का?
विधानपरिषदेच्या मुंबईतील जागेसाठी उमेदवारी कुणाला द्यायची याचा पक्ष विचार करत होता. विधान परिषदेवर रामदास कदम यांच्याजागी शिवसेनेतून सुनील शिंदे, सचिन अहिर, महापौर किशोरी पेडणेकर तर युवासेनेतून सुरज चव्हाण, वरूण सरदेसाई यांची नावं चर्चेत होती. मात्र यातील सुनील शिंदे यांच्या नाववर शिक्कामोर्तब झालं आहे. सुनील शिंदे यांनी मुंबईतील वरळीची विधानपरिषदेची जागा आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना आता विधान परिषदेवर संधी दिल्याचं बोलल्या जातंय.