ज्यांना स्वत: च्या मतदारसंघात मुताऱ्या बांधता आल्या नाहीत, त्या देशमुखांनी आतापर्यंत किती निधी आणला, असा प्रश्न करत संभाजी पाटील निलंगेकरांनी माजी पालकमंत्री आणि आमदार अमित देशमुखांवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर निलंगेकरांनी देशमुखांना जाहीर आव्हानही केलं आहे.
2014 ते 2019 या आमच्या काळातील निधीची तुलना आतापर्यंतच्या त्यांच्या इतिहासाशी जुळवून पाहा, असं आव्हान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमदार अमित देशमुख यांना केलं आहे. ते रविवारी निलंगा येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी अमित देशमुखांवर सडकून टीका केली आहे.
निलंगेकर बोलताना म्हणाले की, "2014 ते 2019 या काळामध्ये भाजपाची सत्ता होती. या काळामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात भरघोस विकास निधी आला होता. अनेक कामं झाली, मात्र सत्ता बदल झाल्यावर अडीच वर्षात विकास निधी कमी आला. त्यातही निलंगा तालुक्यावर कायमच देशमुखांनी अन्याय केला आहे असा आरोप निलंगेकर यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, देशमुख यांनी कायम निलंगाचा आणि निलंगेकरांचा दुस्वास केला आहे. मागील इतिहास जर काढला तर लातूरमध्ये अमित देशमुखांना अनेक वर्ष सत्ता मिळाली , त्या काळात आलेला निधी आणि मी पालकमंत्री असताना आलेला निधी किती? हे एकदा तपासून पहा. देशमुखांना लातूरमध्ये साध्या मुताऱ्या बांधता आल्या नाहीत. आमच्या सत्तेच्या काळात आम्ही त्या बांधल्या आहेत असंही ते यावेळी म्हणालेत.
"मागचा सगळा इतिहास काढा आणि 2014 मधला भाजपच्या काळातील सरकारचा इतिहास काढा. माझं जाहीर आव्हान आहे तिथल्या आमदाराला. त्यांनी माझ्यासोबत बसावं आणि 2014 आणि 2019 सालचा इतिहास काढावा आणि सांगावं निधी कधी, कोणत्या साली जास्त आला आहे ते. त्यांच्या संपूर्ण काँग्रेसच्या कालावधीत जेवढा निधी आला नाही, तेव्हा आम्ही आमच्या सरकारच्या काळात आणला आहे." तर "साध्या मुताऱ्या बांधणं त्यांना जमलं नाही, आमच्या सरकारच्या काळात आम्ही बांधून दिल्यात त्या मुताऱ्या" असंही निलंगेकर बोलताना म्हणालेत.