Shivsena Uddhav Thackeray : शिवसैनिकांची फौज हीच ताकद

‘मराठी माणसाच्या हक्का’साठी या एका वाक्यावरच शिवसेनेचे मागील ६० वर्षांचे राजकारण तोलले होते.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal

‘मराठी माणसाच्या हक्का’साठी या एका वाक्यावरच शिवसेनेचे मागील ६० वर्षांचे राजकारण तोलले होते. मुंबई महापालिकेवर २५ वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता, महाराष्ट्रात दोन वेळा शिवसेनेचा मुख्यमंत्री, लोकसभेचे अध्यक्षपद आणि देशाच्या राजकारणाच्या या ना त्या कारणाने शिवसेना कायम केंद्रस्थानी राहिलेली आहे.

राज्य स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरत राहिले आहे. ‘ठाकरे’ या नावाभोवती एक गूढ वलय होते, धाक आणि आदरयुक्त भीती होती. मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानातून शिवसैनिकांना आदेश देणे आणि शिवसैनिकांकडून त्याचे पालन केले जाणे हा संकेत होता, तो २० जून २०२२ रोजी मोडला.

महाविकास आघाडीच्या सत्तेत मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला शिवसेना नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मजबूत बळावर थेट आव्हान देत पक्ष उभा फोडला. परिणामी उद्धव ठाकरेंना पुन्हा राजीनामा देऊन ‘मातोश्री’ गाठावी लागली.

त्यानंतर शिवसेनेत पडलेली अभूतपूर्व फूट देशाच्या राजकारणातील पक्षांतराचे एक अव्वल उदाहरण म्हणून पाहिली जाते. शिवसेनेच्या ५६ आमदारांपैकी ४० आमदार, १३ खासदार एकनाथ शिंदेंसोबत पक्ष सोडून गेले. दुभंगलेली शिवसेना २१ महिन्यात लोकसभा निवडणुकीला सामोरी जात आहे.

शिवसेनेचे चिन्ह शिंदे यांना मिळाले. तर ठाकरे यांच्या पक्षाला ‘मशाल’ चिन्ह दिले. शिवसेना ठाकरे गटाकडे विधानसभेचे पंधरा तर विधान परिषदेचे दहा आमदार, लोकसभेचे पाच तर राज्यसभेचे दोन खासदार आहेत. ‘ठाकरे’ नावाभोवतीची वडिलोपार्जित पुण्याई घेऊन उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरताहेत.

‘शिवसेना कोणाची’ याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पावणे दोन वर्षातही आला नसल्याने जायबंदी अवस्थेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पक्षाची जमवाजमव करायला सुरुवात केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला २३ टक्के मते होती. पंधरवड्यापूर्वीच ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने १८ टक्के जनमत अजूनही आहे.

तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जेमतेम ४ टक्के जनमत आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर देखील शिवसेनेची चार ते पाच टक्के मते हलू शकली असतील तर या लोकसभा निवडणुकीत इतर कोणत्याही पक्षापेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेचे आव्हान मोठे असणार आहे.

महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत प्रथमच (विधाससभेच्या तीन पोटनिवडणुका वगळता) शिवसेना आघाडी करुन निवडणुकीला सामोरी जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रचाराचे मुद्दे वेगळे, मतदार प्राधान्याने ग्रामीण तर शिवसेनेचा मतदार शहरी आणि हिंदुत्व, मराठी माणूस, मराठी भाषा असे प्रचाराचे मुद्दे होते.

त्यात आता भर पडून हुकूमशाही, गद्दार, परराज्यात जात असलेले उद्योगधंदे या विषयांची भर पडली आहे. तरी देखील राष्ट्रीय पातळीवर काँग्रेससारखा पक्ष सोबत असण्याची आवश्यकता वाटणे गैर नाही. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका केली जाते, ‘आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही’ आमचे हिंदुत्व हाताला काम आणि ह्रदयात राम असल्याचे उत्तर ठाकरे खुबीने देतात.

किंवा ‘सीएएबाबत’ ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजपकडून केली जाते, तेव्हा १५ लाख खात्यात येणार होते त्याचे काय झाले त्याचे उत्तर आधी द्या, असा प्रति सवाल केला जातो. शिवसेनेमध्ये ठाकरेंकडे आता हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच नेते राहिले असले तरी शिवसैनिकांची फौज मोठी आहे. या शिवसेनेला आधुनिक विचारांची, तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठी आदित्य ठाकरेंकडून प्रयत्न होत असतात.

व्यावसायिक निवडणूक यंत्रणेचा देखील ते काही प्रमाणात वापर करत पारंपरिक निवडणूक प्रचाराला आधुनिकतेची जोड देत आहेत. अशी सगळी जमवाजमव शिवसेनेच्या उध्दव ठाकरेंकडून होत असताना खरोखरच उध्दव ठाकरे सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होणार की लाट मतांशिवाय ओसरुन जाणार हे या लोकसभा निवडणुकीत ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com