

Solapur History : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असताना हा वाद अधुनमधून राजकीय पटलावर येतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री बासवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूर शहर आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा केला आहे. त्यास सोलापूर व अक्कलकोटवासियांनी कडाडून विरोध करीत बोम्मई यांच्या विधानाचा निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहराचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊयात.
आम्हाला महाराष्ट्रच हवा!
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा आदी तालुक्यांचा समावेश आहे. सीमावादावर यापूर्वी नेमलेल्या महाजन आयोगासमोर स्थानिक नागरिकांनी कर्नाटक प्रांतात समाविष्ट होण्यास स्पष्ट नकार दिला होता. दिवंगत सहकार नेते, माजी आमदार वि. गु. शिवदारे, अक्कलकोटचे माजी आमदार बी. टी. माने, तत्कालीन जिल्हा स्थानिक स्वराज्य बोर्डाचे अध्यक्ष कल्लप्पा सोनकांबळे आदींनी महत्वाच्या साक्षी देताना महाराष्ट्रातच राहण्याचा निर्धार स्पष्ट केला होता.
काय होता महाजन आयोग
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादातून मार्ग काढण्यासाठी सत्तावन्न वर्षापूर्वी न्या. मेहेरचंद महाजन यांच्या एकसदस्य आयोगाची नेमणूक केंद्र सरकारने केली . तथापि न्या . महाजन यांची पक्षपाती भूमिका व महाराष्ट्राला न्याय देण्याबाबतची खळखळ यातून निर्माण झालेला ' महाजन आयोगाचा अहवाल ' महाराष्ट्राने व सीमा भागातील जनतेने फेटाळून लावला. तेव्हापासून हा सीमा प्रश्न आज या क्षणा पर्यत तसाच लोंबकळत पडलेला आहे.
समस्त राज्याची दक्षिण काशी
सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागात आहे. सोलापूर जिल्ह्यात राज्यातील भाविकांची श्रद्धा असलेली अनेक तिर्थक्षेत्र आहेत. त्यामध्ये पंढरपूरची विठूमाऊली, सोलापूरपासून जवळ उस्मानाबादमध्ये असलेले महाराष्ट्राचे कुलदैवत आई तूळजाभवानी आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचा समावेश होते. त्यामूळे या सोलापूरच्या मातीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोन्नलगेचे सोलापूर कसे झाले
सोलापूर जिल्ह्याला हे नाव कसे पडले याविषयी अनेक तर्क लढवले जातात. कदाचित सोळा गावांचे मिळून निर्माण झालेले म्हणून सोलापूर असे म्हणले जाते. प्राचीन लेखांमध्ये त्याचा निर्देश ‘सोन्नलगे’ किंवा ‘सोन्नलागी’ असा आढळतो. यादव काळापर्यंत हे नाव प्रचलित होते. पुढे सोन्नलगेचे रूपांतर सोन्नलपूर असे होऊन सोळाव्या शतकापर्यंत ते वापरात राहिले, असल्याते इतिहासतज्ज्ञ सांगतात. सोलापूर किल्ल्यातील एका कोरीव लेखात सोन्नलापूर असा उल्लेख आढळतो. पुढे ‘सोलापूर’ असे लिहिले जाऊ लागले. मोगल काळात सोलापूरऐवजी सन्दलापूर असे सोलापूरचे नाव होते. शिवकालीन युगात हे नाव सोलापूर असे झाले.
प्राचीन वारसास्थळ
सोलापूर शहराला प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इ. स. पू. २०० पासून सातवाहन, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे यादव, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे आणि शेवटी ब्रिटिश या विविध सत्तांनी सोलापूरवर राज्य केले.
सोलापूरच्या वस्त्रोद्योगाची वैभवशाली परंपरा
गिरणगाव म्हणून सुपरिचित असलेल्या सोलापूर शहराला वस्त्रोद्योगाची वैभवशाली परंपरा आहे. १८५९ मध्ये सोलापूरमध्ये पहिला लोहमार्ग आला आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली. १८७७ मध्ये पहिली कापड गिरणी ‘सोलापूर स्पिनिंग ॲन्ड वीव्हिंग कंपनी ची स्थापना झाली. हातमाग, यंत्रमाग, सूतगिरण्या, कापडगिरण्या आणि वस्त्रोद्योगाशी निगडित विविध प्रक्रियाउद्योग येथे चालतात. सोलापूरच्या बाजारात जेकॉर्ड चादरी, पलंग बेडशीट, सतरंज्या, टॉवेल, नॅपकिन व सुती साड्या जगभर प्रसिद्ध आहेत.
स्वातंत्र्य संग्रामातील नेते
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक नेत्यांनी आपले बलिदान दिले आहे. यापैकी, यल्लप्पा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी, श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा, जगन्नाथ भगवान शिंदे व अब्दुल रसूल कुर्बान हुसेन या चौघांचेही नाव आदराने घेतले जाते. कारण, ब्रिटीश सरकारविरूद्ध कट रचल्याच्या आरोपाखाली या चौघांना फाशी १२ जानेवारी १९३१ देण्यात आली होती.
सोलापूर हे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची जन्मभूमी आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लक्ष्मीनारायण बोल्ली, द्वारकानाथ कोटणीस, यू. म. पठाण ह्या येथील उल्लेखनीय व्यक्ती आहेत. देशभक्त रामकृष्णजी जाजू यांची सोलापूर ही कर्मभूमी होती.
सर्वात मोठी ग्रामपंचायत
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलुज ही ग्रामपंचायत आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावारूपास आली आहे . महाराष्ट्राच्या दृष्टीने ती एक अत्यंत महत्त्वाची अशीच बाब आहे.
भौगोलिक महत्त्व
सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ तालूके आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली, सातारा व पुणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. सोलापूरात नीरा, भिमा या मोठ्या नद्यांसह सीना, , भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या आहेत.
सोलापूर जिल्ह्याची सीमा कर्नाटकला लागलेली आहे. तसेच आंध्र प्रदेश हे राज्यही सोलापूर जिल्ह्याला जवळ आहे. सोलापूर जिल्ह्यात मराठी, कन्नड व तेलुगू भाषेचा व संस्कृतींचा संगम झाल्याचे चित्र दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.