विद्यार्थ्यांनो, परीक्षेत कॉपी केल्यास ३ वर्षे थांबेल शिक्षण! यंदा पाणी वाटप करणारे कर्मचारी नसणार; विद्यार्थ्यांना चप्पल-बूट बाहेरच काढावे लागणार

कॉपी करताना किंवा कॉपी करून उत्तरे लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्याला एक ते तीन वर्षे (कॉपीचे प्रमाण पाहून) पुन्हा परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे कोणीही कॉपी न करता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन पुणे बोर्डाने केले आहे.
maharashtra ssc board exam
maharashtra ssc board examSAKAL

सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असून इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होईल. कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल विभागाची २८ तर जिल्हा परिषदेची १८ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. कॉपी करताना किंवा कॉपी करून उत्तरे लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्याला एक ते तीन वर्षे (कॉपीचे प्रमाण पाहून) पुन्हा परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे कोणीही कॉपी न करता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन पुणे बोर्डाने केले आहे.

जिल्ह्यातील सहा प्रांताधिकारी, ११ तहसीलदार, नायब तहसीलदार, पंचायत समित्यांचे ११ गटविकास अधिकारी, माध्यमिक, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी यांच्यासह दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांची विशेष पथके देखील जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.

संवेदनशील परीक्षा केंद्रांवर महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी बैठे पथक म्हणून नेमले जातील. तर उर्वरित परीक्षा केंद्रावर अंगणवाडी पर्यवेक्षक, महसूल व जिल्हा परिषदेचे कर्मचारी, जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. बैठे पथकात एकूण तीन सदस्य असतील, त्यात एक महिला असणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी केंद्रावर हजर राहायचे असून पेपर सुरू झाल्यावर कोणालाही परीक्षेला बसू दिले जाणार नाही. परीक्षा हॉलमध्ये जाताना प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेतली जाईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

कॉपी प्रकरणांची अशी होते पडताळणी

कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निर्णय निकालापूर्वीच होतात. संबंधित विद्यार्थ्याने खरोखर कॉपी केली होती का, कॉपीतील किती मजकूर उत्तरपत्रिकेत जसाच्या तसाच लिहिला, नेमकी कॉपी कोणी केली होती यासंबंधीची माहिती घेताना त्या विद्यार्थ्याच्या मागील व पुढे बसलेल्या विद्यार्थ्याचाही जबाब बोर्डाचे चौकशी अधिकारी नोंदवतात. त्यानंतर कॉपी प्रकरणातील विद्यार्थ्याला एक वर्षापर्यंत की तीन वर्षांपर्यंत परीक्षेची बंदी घालायची, याचा निर्णय बोर्डाकडून होतो.

पाणी वाटप करणारे कर्मचारी यंदा नसणार

परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पाणी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक आता शाळांना करता येणार नाही. बोर्डाने त्यासंबंधीचे आदेश सर्वच केंद्रांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे काम त्यांच्याच माध्यमातून होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षीपासून परीक्षा हॉलवरील पर्यवेक्षकच स्वत:कडे पाण्याची बाटली ठेवून विद्यार्थ्यांना पाणी देतील, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडताना पायात चप्पल, शुज बाहेर काढूनच आत प्रवेश द्यावा, अशाही बोर्डाच्या सूचना आहेत.

जिल्हा परिषदेकडून १८ भरारी पथके

दहावी- बारावीची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, यासाठी महसूल व जिल्हा परिषदेची भरारी पथके तालुकानिहाय शाळांना भेटी देतील. जिल्हा परिषदेच्या ११ विभागप्रमुखांसह माध्यमिक, प्राथमिक व महापालिका शिक्षण मंडळ, ‘डायट’चे प्राचार्य, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी, यांची एकूण पाच आणि माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांची दोन विशेष पथके देखील नेमली आहेत. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी.

- स्मिता पाटील, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

जिल्ह्यातील दहावी- बारावी परीक्षेची स्थिती

  • इयत्ता बारावीचे विद्यार्थी

  • ५२,८७०

  • परीक्षा केंद्रे

  • ११८

  • इयत्ता दहावीचे विद्यार्थी

  • ६५,७४९

  • परीक्षा केंद्रे

  • १८२

  • भरारी पथके

  • ४६

  • बैठे पथके

  • ३००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com