आजपासून शिक्षकांना उन्हाळी सुट्टी! पाचवी-आठवीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी रोज शाळेत येण्याचे शिक्षकांवर बंधन नाही

१५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने पाचवी- आठवीच्या वर्गावरील शिक्षकांना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना या सुटीच्या काळात शिकवावे लागणार आहे. त्यासाठी नियमित शाळेत येण्याचे बंधन नाही, पण परीक्षेच्या दृष्टीने त्यांच्या सोयीने पूर्वतयारी करून घ्यावी लागणार आहे.
exams
examsesakal

सोलापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता उद्यापासून (ता. ८) शिक्षकांना उन्हाळा सुटी लागणार आहे. ६ जूनपासून त्यांना सुटी लागली होती, पण निवडणुकीमुळे त्यांना कामावर यावे लागले होते. दरम्यान, १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गावरील शिक्षकांना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना या सुटीच्या काळात देखील शिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना नियमित शाळेत येण्याचे बंधन नाही, पण त्यांची परीक्षेच्या दृष्टीने त्यांच्या सोयीने पूर्वतयारी करून घ्यावी लागणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘आरटीई’ ॲक्टनुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण अवलंबले होते. त्यामुळे २०१० पासून या आठ वर्गातील एकही विद्यार्थी नापास झाला नाही. पण, दहावी, बारावीनंतर शाळा सोडून देणाऱ्यांची संख्या लक्षणीय राहिली. या पार्श्वभूमीवर आता धोरणात बदल करून पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना अंतिम सत्र परीक्षेत पास होण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्याची सुरवात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासूनच झाली आहे.

या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आता २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची शाळा सुरू होण्यापूर्वी फेरपरीक्षा होणार आहे. त्यात त्यांना उत्तीर्ण व्हावेच लागेल, अन्यथा पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे. परंतु, या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संबंधित विषय शिक्षकांनी उन्हाळा सुटीत उपचारात्मक अध्यापन करावे लागणार आहे. त्यासाठी दररोज शाळेत येण्याचे बंधन नाही, पण अनुत्तीर्ण विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्याशी संपर्क ठेवून परीक्षेची तयारी करून घ्यायची आहे.

शिक्षकांनी पाचवी व आठवीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यावी

इयत्ता पाचवी व आठवीतील जे विद्यार्थी अंतिम सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांची १५ जूनपूर्वी फेरपरीक्षा होईल. त्यात उत्तीर्ण झालेल्यांनाच पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संबंधित विषय शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी शिक्षकांना दररोज शाळेत येण्याचे किंवा विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याची गरज नाही. ते विषय शिक्षक विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार त्यांना अध्यापन करू शकतील.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

निकालाची टक्केवारी अद्याप अस्पष्टच

सोलापूर जिल्ह्यात इयत्ता पाचवीच्या वर्गात ७१ हजार ४५१ तर इयत्ता आठवीच्या वर्गात ७० हजार ५०३ विद्यार्थी आहेत. त्यांची अंतिम सत्र परीक्षा उन्हाळा सुटी लागण्यापूर्वी पार पडली आहे. पण, या परीक्षेत नेमकी किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले याची आकडेवारी अद्याप एकत्रितपणे समोर आलेली नाही. त्यामुळे खुद्द प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनाच पाचवी व आठवीच्या निकालासंदर्भात आकडेवारी देता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com