
लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका येणार आहेत. त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासून कामाला लागले पाहिजे.
काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का; 'शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार'
कऱ्हाड (सातारा) : शिवसेनेच्या (Shivsena) सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचीच तयारी करून कामाला लागावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) जो आदेश देतील, जो निर्णय घेतील. त्याप्रमाणे वाटचाल करावी आणि त्यांचे हात मजबूत करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख उदय सामंत (Uday Samant) यांनी केले.
शिवसेनेच्या संपर्क मेळाव्याअंतर्गत कऱ्हाड, पाटण तालुक्याचा मेळावा येथे झाला. त्यामध्ये ते बोलत होते. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, शहरप्रमुख शशिकांत करपे, युवा सेनेचे कुलदीप क्षीरसागर, महिला आघाडीच्या अनिता जाधव, हेमलता शिंदे, विश्वास सावंत, शंकर संकपाळ आदी उपस्थित होते.
देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सक्षम मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती मिळाल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यांचे नेतृत्व देशव्यापी बनविण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करून मंत्री सामंत म्हणाले, ‘‘लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका येणार आहेत. त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासून कामाला लागले पाहिजे. गाव, वाडी, वस्तीवर पोचले पाहिजे. आठवड्यातील दोन दिवस पक्षासाठी देऊन काम केल्यास पक्ष मजबूत होईल. शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातही स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी तयारीला लागावे.’’

Uday Samant
प्रा. बानुगडे-पाटील यांनी कोरोना महामारीत महाराष्ट्राला सावरण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी समर्थपणे केले. सत्तेसाठी राज्य सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न विरोधी पक्षाकडून सुरू असून, गॅस, पेट्रोल, डिझेल यांची दरवाढ करून केंद्र सरकारने जनतेची आर्थिक लूट केली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या वेळी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख शेलार यांनी प्रास्ताविक केले. तालुका संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
कऱ्हाड पालिकेत शिवसेना जाईल : मंत्री देसाई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला समोर ठेवून काम करण्याचा दिलेला सल्ला आम्ही पाळला आहे, असे सांगून गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, ‘‘शिवसैनिकांनी मनावर घेतल्यास काहीही शक्य होते, हे सातारा जिल्ह्यात एकावरून दोन आमदार गेले यावरून दिसून येते. कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीतही ताकदीने सामोरे जाऊ. प्रभाग, वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांनी चांगली तयारी केल्यास शिवसेनेचा प्रवेश कऱ्हाड नगरपालिकेत होईल.’’