सोलापूर : लोणावळा, भीमाशंकर खोरे परिसरात चांगला पाऊस झाला आहे. खडकवासला धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे उजनी धरणात सध्या १२ हजार ४०० क्युसेकने पाणी येत आहे. उजनी आता उणे ५.६३ टक्क्यावर आले आहे. वरून येणारा विसर्ग चांगला असल्याने मंगळवारी (ता. १) धरण प्लसमध्ये येईल, असा विश्वास लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरण काठोकाठ भरले आहे. आता धरणात येणारे पाणी खाली सोडून दिले जात आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्यावर उजनी धरणात येणारा विसर्ग वाढतो आणि आपल्याकडे कमी पाऊस झाला, तरी धरण १०० टक्के भरते.
आता चासकमान, वडिवळे आणि कासारसाई या धरणांमधील पाणी उजनीत येत आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी उणे ८.६९ टक्के असलेले उजनी धरण रात्री उशिरापर्यंत सहा टक्क्यावर आले होते. सध्या दौंडमधून उजनीत १२ हजारांवर विसर्ग सुरूच आहे. मागील २० दिवसात धरणात १५ टीएमसी पाणी आले आहे. पावसाळा सुरू होऊनही ९ जुलैला धरण उणे ३६ टक्के होते. पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास सोलापूर शहरासह धरणावर अवलंबून असलेल्या शहरांमध्ये पाणी टंचाईची भीती होती. पण, १२ जुलैपासून लोणावळा, भीमाशंकर खोरे आणि खडकवासला धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आणि पाणी टंचाईची चिंता मिटली. आता जिल्ह्यात देखील पावसाला सुरवात झाल्याने पेरणी पूर्ण होत आली आहे. उजनीचा पाणीसाठा पण वाढत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
उजनी धरणात ६० टीएमसी पाणी
उजनीचा मृत साठा ६३.६५ टीएमसी आहे. तर जिवंत पाणीसाठा ५३.५७ टीएमसी आहे. मागच्या वर्षी ७ मे रोजी धरण उणे झाले होते. २०२२ च्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात एक महिना अगोदरच धरण उणे झाले होते. त्यामुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दुबार पंपिंग करण्याची वेळ येणार, असे बोलले जात होते. पण, तो धोका आता दूर झाला आहे. दरम्यान, धरणात सध्या एकूण ६० टीएमसी पाणी आहे. आता दौंड व बंडगार्डन येथून येणारा विसर्ग वाढल्यास काही दिवसात धरण भरू शकते.
नदी काठावरील लोकांची सुरक्षितता महत्त्वाची...
पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. तेथील धरणे आता १०० टक्क्यांकडे वाटचाल करू लागली आहेत. त्यावेळी वरून उजनी धरणात येणारा विसर्ग मोठा असणार आहे. त्यामुळे उजनी काही दिवसात काठोकाठ भरते. त्यावेळी अचानक भीमा नदी काठावरील लोकांना सतर्क राहा, अशा सूचना दिल्या जातात. तरीदेखील दरवर्षी अनेकजण पुरात अडकतात, हा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर उजनी ६० टक्के भरल्यावर पावसाचा अंदाज घेऊन त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे जरुरी असल्याचे जाणकारांचे मत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.