मुंबई : आपले सरकार यशस्वी होण्यासाठी दमदार पावले टाकणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला खूप काम करायचे आहे. त्यामुळे अनावश्यक बोलून वेळ घालवू नका अन् परस्परांविरोधात तर अजिबातच बोलू नका, असा सल्लावजा इशारा आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकाऱ्यांना दिला.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज झालेल्या पहिल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. सर्व मंत्र्यांनी एकदिलाने काम करावे, असे आज कटाक्षाने सांगण्यात आले. काही गोष्टी अनौपचारिकरीत्या सांगण्यात आल्याचे समजते. महिन्याहून अधिक काळानंतर झालेल्या विस्तारामुळे जनतेत चर्चा सुरु होती तसेच विस्तारात काही आरोप असलेल्या मंत्र्यांच्या समावेशाबद्दल टीका होत आहे. विरोधी बाकांवरचे दोन नेते अटकेत असताना या विषयांवर बोलण्याचा त्यांना हक्क नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले; मात्र नव्या सरकारने कारभार सुरू करताना विरोधी पक्षांच्या हाती टीकेचे मुद्दे देवू नका, असे आवर्जून सांगण्यात आले.
महसूल कुणाकडे ?
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर महत्त्वाची खाती नेमकी कुणाकडे जावीत, याबद्दलही अद्याप एकवाक्यता झालेली नाही. शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते राहणार असून फडणवीस गृह आणि अर्थ ही दोन्ही खाती वेगाने निर्णय व्हावेत, यासाठी स्वत:कडे ठेवणार असल्याचे सांगितले जाते आहे. या तीन खात्यांबाबत फारसे मतभेद नसले तरी महसूल खाते शिंदे गटाकडे ठेवावे की भाजपला द्यावे याबाबत निर्णय झालेला नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.