राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र येत्या 15 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हवामान विभागाकडून आज राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. तर बीड, लातूर, धाराशिव, सांगली, परभणी आणि सोलापूरमध्ये वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून आज विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे लातूर, बीड, जालना, सोलापूर, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर आणि इतर अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सलग तिसऱ्या दिवशी विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यातही वादळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबागांची विशेषतः लिंबू, संत्रा, आंबा, केळी बागांची पुरती दैना उडाली आहे, तसेच रब्बी, उन्हाळी पिकांसह भाजीपाला पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून, नुकसानीची तीव्रता आणि क्षेत्र वाढत चालले आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. अकोला जिल्ह्यात वादळ व गारपिटीने पिके जमीनदोस्त झाली आहेत. बुधवारी (ता. १०) सलग तिसऱ्या दिवशी वादळी पावसाने धुमाकूळ घातला. याचा मोठा फटका लिंबू बागा, आंब्याला बसला. अनेकांच्या बागा उन्मळून पडल्या. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला आहे. पावसासह जोरदार वारा वाहिल्याने नुकसान अधिक झाले. कांदा, ज्वारी, भाजीपाला, आंबा, लिंबू, पपई, केळी, गहू, टरबूज-खरबूज अशा विविध पिकांचे हे नुकसान झाले आहे.
पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पुन्हा अवकाळी पावसाने दणका दिला. त्याचा फटका उन्हाळी धानासोबतच भाजीपाला व फळपिकांना बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांच्या पावसाने दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये सर्वाधिक ६३८.१७ हेक्टर नुकसान एकट्या बाभूळगाव तालुक्यातील आहे. गुरुवारी (ता. ११) पहाटे गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत पावसाने पुन्हा हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यात मोठी गारपीट झाल्याने १२ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला.
मराठवाडज्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही अनेक ठिकाणांना गुरूवारी वादळी पाऊस, गारपिटीने झोडपून काढले. परभणी जिल्ह्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात द्राक्ष, आंब्यांच्या बागांना फटका बसला आहे. गुरुवारी काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. त्यामुळे काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या द्राक्ष, आंबा बागांना फटका बसला.
जळगाव जिल्ह्यात पावसाने तीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. केळी, मका, गहू व अन्य पिकांची हानी झाली असून, जामनेर, बोदवड भागांत अधिकचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. तीन हजार ४११ हेक्टरवर नुकसानीची माहिती प्रशासनाने दिली आहे.
परभणी जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. भाऊचा तांडा (ता. सोनपेठ) येथे वीज पडून शेळ्या चारणाऱ्या हरिबाई सुरनर यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, ईळेगाव (ता. गंगाखेड) येथील शेतकरी बापू शेळके (वय ६०) हे आज दुपारी शेतात मशागतीच्या कामासाठी गेले असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय, खापट पिंपरी (ता. सोनपेठ) येथे किशोर खंदारे यांची शेळी, तर शेळगाव येथे गिरीश हल्गे यांच्या मालकीचा बैल वीज पडून दगावला.
पूर्व विदर्भात शुक्रवारी वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीचा (यलो अलर्ट) इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात आकाश ढगाळ झाले आहे. विदर्भात कमाल तापमानातील घट कायम आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांच्या खाली आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.