
सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाने २०२२ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार २६ जुलै २०२२ पासून आरक्षण सोडतीची कार्यवाही सुरू झाली. २९ जुलै २०२२ रोजी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध झाली. २९ जुलै ते २ ऑगस्ट २०२२ पर्यंत गणनिहाय आरक्षणावर जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती, सूचना प्राप्त झाल्या. त्यानंतर निवडणुकीस स्थगिती आल्याने प्रक्रिया थांबली. आरक्षण अंतिम झाल्यावर प्रारुप मतदार यादी, हरकती-सूचना आणि त्यांनतर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर अर्ज स्विकारणे, अर्ज माघार, अंतिम उमेदवारांची यादी आणि त्यानंतर प्रचारासाठी किमान १५ दिवस दिले जातील. त्यानंतर मतदान व निकाल, असे टप्पे आता सप्टेंबरपर्यंत पार पडतील. निवडणुका सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत होईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
मुदत संपूनही तीन वर्षांपासून थांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आता हालचालींना वेग आला आहे. पण, १० टक्के लोकसंख्या वाढ ग्राह्य धरून स्थानिक स्वराज्य संस्थांचे वाढीव प्रभाग, गट, गण ठेवायचे की पूर्वीचीच संख्या कायम ठेवायची हे निश्चित नाही. तरीपण, तीन वर्षांपासून राजकीय पक्षांचे विशेषत: सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते संधीची वाट पाहू लागले आहेत. त्यातील बहुतेक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी वाढीव प्रभाग कायम ठेवले जाऊ शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे.
मात्र, सत्ताधारी तिन्ही पक्षप्रमुखांच्या बैठकीनंतर त्यावर अंतिम निर्णय होईल. दरम्यान, मागे ज्या टप्प्यावर निवडणुकीची प्रक्रिया थांबली होती, तेथून पुढे कार्यवाही सुरू केल्यास सप्टेंबरअखेर निवडणुका होतील. या पार्श्वभूमीवर आता किती सदस्यांचा प्रभाग राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शासन स्तरावरून परिपत्रक येईल, त्यानुसार कार्यवाही केली जाईल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भातील तयारी सुरू झाली आहे. लोकसंख्येची अंदाजित वाढ ग्राह्य धरून जिल्हा परिषदेचे गट तर पंचायत समित्यांचे गण वाढले आहेत. पण, गट, गण वाढीव राहणार की जुनेच कायम ठेवले जातील, हे स्पष्ट नाही. त्यासाठी शासन स्तरावरून परिपत्रक येईल. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
- संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी, सोलापूर
...तर आरक्षण पुन्हा काढावे लागणार
सोलापूर जिल्हा परिषदेचे पूर्वी ६८ गट होते, २०२२ मध्ये निवडणुका घ्यायचे निश्चित झाले. त्यावेळी १० वर्षात १० टक्के नैसर्गिक लोकसंख्या वाढ ग्राह्य मानून प्रभागरचनेत बदल झाला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ९ गट वाढले. पंचायत समित्यांचे गण वाढले आणि महापालिकेचेही प्रभाग वाढतील. पण, २०११ नंतर जनगणना झाली नसल्याने आता लोकसंख्येत नेमकी किती वाढ धरायची, हा प्रश्न आहे. त्यामुळे पूर्वीची प्रभागरचना कायम ठेवून निवडणूका घेतल्या जाऊ शकतात. तसे झाल्यास आरक्षण सोडत पुन्हा काढावी लागेल. वाढीव प्रभाग, गट-गणानुसार निवडणुका घेण्याचे ठरल्यास २९ जुलै २०२२ रोजीच आरक्षण सोडत झाली आहे. त्यामुळे पुन्हा आरक्षण सोडत काढावी लागणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.