मुंबई : ‘शाश्वत विकास’ या महाराष्ट्र सरकारच्या ध्येयाचा जागतिक पातळीवर स्वीकार झाल्याचे दिसून येत आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतही पर्यावरण संवर्धनाची सर्वाधिक चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर भारत प्रगती करतोय हे दाखविण्यासाठी विविध राज्यांनी एकत्र येऊन गुंतवणूक आणण्यावर भर दिला असल्याचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या वतीने आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री नितीन राऊत सहभागी झाले आहेत. परिषदेतील पर्यावरणाबाबतच्या परिसंवादात तसेच माध्यमांसमवेत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, की दावोस आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगन, कर्नाटकसह विविध राज्यांचे असलेले प्रतिनिधित्व ठळक जाणवत आहे. सर्व राज्ये एकत्र येऊन देशात गुंतवणूक येईल यासाठी सकारात्मक स्पर्धा करीत आहेत. महाराष्ट्र संशोधन आणि विकास, ईव्ही बॅटरी, अक्षय ऊर्जा उत्पादनाच्या क्षेत्रावर अधिक भर देऊ इच्छितो. यामुळे उत्पादक महाराष्ट्राला पसंती देत असल्याचे दिसत असून ई-मोबिलिटी, अक्षय ऊर्जा, बॅटरी उत्पादन, डेटा सेंटर, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. मागील तीन दिवसात सुमारे ८० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाल्याची माहिती त्यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.