पुणे: कथित कामगार युनियनच्या नावाखाली काही नेते चित्रपट व मालिकांच्या निर्मात्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून खंडणी उकळत आहेत. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवुडही त्रस्त झाले आहे. परिणामी महाराष्ट्राऐवजी आता परराज्यांमध्ये चित्रीकरण करण्यास पसंती दिली जाऊ लागली आहे. चित्रपटसृष्टीतील एका कामगार युनियनच्या नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली. याप्रकरणी युनियनच्या पाच जणांवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर चित्रपट व मालिकांचे निर्माते, कार्यकारी निर्माते, कलादिग्दर्शक, प्रॉडक्शन मॅनेजर आदींनी कथित कामगार युनियनच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या त्रासाला वाचा फोडली आहे. (film and television producer are worried due to ransom and blackmailing)
मुंबई, पुण्यासह सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली या निसर्गसंपन्न जिल्ह्यांत मराठी चित्रपट, मालिकांसह हिंदी, दक्षिण भारतीय चित्रपटांचे चित्रीकरण होते. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून हे चित्रीकरण थंडावले आहे. मात्र, लोकडाउन शिथिल झाल्यानंतर चित्रीकरण पुन्हा सुरु झाले. मात्र, कथित कामगार युनियनच्या नेत्यांचा नाहक जाच सहन करावा लागत असल्याचे काही निर्माते व कार्यकारी निर्मात्यांनी सांगितले.
स्पॉटबॉय, सेटींगबॉग, पेंटर, कारपेंटर अशा विविध कामगारांच्या संघटना आहेत. त्यामध्ये काही राजकीय पक्षांच्याही संघटना आहेत. संबंधीत नेत्यांकडून चित्रीकरण ठिकाणी संघटनेच्या लोकांना कामावर घेण्यासाठी दबाव टाकला जातो. चित्रीकरणही बंद पाडले जाते. त्यांनी सांगितलेल्या व्यक्तींना कामावर न घेतल्यास १०० ते २०० कामगारांच्या पगाराची मागणी केली जाते. अनेकजण वाद टाळण्यासाठी या नेत्यांना पैसे देऊन मोकळे होतात. तर काही जण त्यांच्या कामगारांना कामावर ठेवतात. मात्र, संबंधीत कामगार व्यवस्थित काम करत नसल्याने चित्रपट, मालिकांना मोठ्या प्रमाणात फटकाही बसत असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई पुण्यासह वाई, भोर, महाबळेश्वर, पांचगणी, मेणवली, सासवड, पुरंदर अशा ठिकाणी चित्रीकरण होत होते. मात्र ब्लॅकमेलिंग व खंडणी उकळण्याच्या प्रकारामुळे अनेक निर्मात्यांनी आता अन्य राज्यात चित्रीकरण करण्यास सुरूवात केली आहे.
राज्यासाठी ही धोक्याची घंटा!
राज्यातील ‘फिल्म सिटी’ उत्तर प्रदेशमध्ये नेण्याचा प्रयत्न होत असताना, निर्मात्यांना कथित कामगार संघटना, राजकीय पक्षांच्या संघटना व गुंडांकडून होणाऱ्या त्रासाची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधीतांवर कठोर कारवाई केल्यास महाराष्ट्रातून अन्य राज्यांत जाणारे चित्रीकरण थांबू शकेल.
चित्रीकरणाच्या ठिकाणी कामगार युनियन, राजकीय पक्षांच्या संघटना व गुंडांचा मोठा त्रास होतो. चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी देऊन अनेकदा ब्लॅकमेल केले जाते. खंडणी उकळण्यासाठी देखील असे प्रकार केले जातात. हे थांबण्यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजचे आहे.
-संजय ठुबे, कार्यकारी निर्माते
-मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.