'द कश्मीर फाइल्स'चा दहशतवाद्यांशी थेट संबंध : जीतनराम मांझी
'कश्मीर फाइल्स'च्या सदस्यांचं दहशतवादी कनेक्शन तपासलं पाहिजे.
The Kashmir Files : अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakrborty), चिन्मय मांडलेकर (Chinamay mandlekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. देशभरातून या चित्रपटाचं जोरदार कौतुक होत आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ 1990 च्या कश्मीर बंडखोरी दरम्यान काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित चित्रपट आहे. परंतु, एकीकडं देशभरातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, दुसरीकडं अनेकांकडून चित्रपटावर जोरदार टीका देखील केली जात आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि 'हम'चे सुप्रीमो जीतनराम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाला दहशतवाद्यांचं षडयंत्र म्हटलंय. मांझी यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, हा चित्रपट म्हणजे दहशतवाद्यांचा एक कट देखील असू शकतो. कारण, दहशतवादी संघटना काश्मिरी ब्राह्मणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळं काश्मिरी ब्राह्मण भीतीमुळं पुन्हा काश्मीरमध्ये जाऊ नयेत, असा त्यांचा हेतू आहे. कश्मीर फाइल्सच्या सदस्यांचं दहशतवादी कनेक्शन तपासलं पाहिजे, असंही ते म्हणाले. सध्या बिहारमध्ये 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त करण्यात आलाय. परंतु, बिहार एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाच्या जीतनराम मांझी यांनी या वादाला नवं वळण दिलंय.
गोध्रा दंगलीवरही चित्रपट बनवावा : राबडी देवी
याआधी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi) यांनी चित्रपट टॅक्स फ्री करण्याला विरोध केला होता आणि गोध्रा दंगलीवरही चित्रपट बनवावा, असं म्हटलं होतं. यानंतर एचएएमचे राष्ट्रीय प्रवक्ते दानिश रिझवान यांनी राबडी देवी यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, देशातील चारा घोटाळा आणि अल्पावधीत मालमत्ता ताब्यात घेण्यावर एक चित्रपट बनवावा, असा टोला त्यांनी राबडींना लगावला होता. दरम्यान, जीतनराम मांझी यांच्या या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘द कश्मीर फाइल्स’मध्ये खोटी कहाणी : ममता बॅनर्जी
'द कश्मीर फाइल्स'च्या वादात पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी उडी घेतलीय. हा चित्रपट कोणीही सभागृहात जाऊन पाहू नये, असं त्यांनी म्हटलंय. तसंच या चित्रपटांत खोटी कहाणी दाखवण्यात आली असून त्यात कोणतंही तथ्य नाहीय, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Director Vivek Agnihotri) यांना 'Y' दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. अग्निहोत्रींच्या सुरक्षेसाठी चार ते पाच सशस्त्र कमांडो तैनात करण्यात आले आहेत.