Jackie Shroff: जॅकी श्रॉफ बॉलीवूडच्या त्या मोजक्या अभिनेत्यांपैकी एक आहे,ज्यानं आपल्या मेहनतीच्या बळावर बॉलीवूडमध्ये एक स्थान बनवलं. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं जॅकी श्रॉफनं आपलं शालेय शिक्षण अर्ध्यातच थांबवलं. पण तेव्हा जॅकीनं कठीण परिश्रम करुन बॉलीवूडमध्ये फक्त आपली केवळओळख बनवली नाही तर टॉपच्या कलाकारांच्या रांगेत स्वतःला नेऊन ठेवलं. जॅकी श्रॉफ अभिनेता बनण्याआधी मुंबईतील एका चाळीत राहत होते. 'हीरो' सिनेमातून दमदार पदार्पण केल्यानंतर देखील जॅकी श्रॉफ कितीतरी वर्ष त्या चाळीत रहात होते. जॅकी श्रॉफ आजही आपले ते दिवस विसरलेले नाहीत,जेव्हा त्याच चाळीत मेकर्स जॅकी श्रॉफला आपल्या सिनेमात साइन करण्यासाठी त्यांच्या चाळीतील टॉयलेटच्या बाहेर रांग लावून उभे असायचे.(Jackie Shroff on bollywood actors insecurity)
जॅकी श्रॉफ एका मुलाखतीत इतर कलाकारांमुळे वाट्याला येणारी असुरक्षितता तसंच इंडस्ट्रीत आऊटसाइडर असल्यामुळे जे सहन करावं लागलं याविषयी भाष्य केलं आहे. जॅकी श्रॉफला जेव्हा विचारलं गेलं की, दिग्दर्शक-निर्माते त्यांना सिनेमात साइन करण्यासाठी ते राहत असलेल्या चाळीपर्यंत यायचे, हे किती खरं आहे? तेव्हा उत्तर देताना जॅकी श्रॉफ म्हणाले,''हो मेकर्स चाळीत यायचे. आणि तिथे येऊन मला स्क्रीप्ट ऐकवायचे. ते माझ्या घरात जे ड्रम उलटे ठेवलेले असायचे त्यावर बसायचे. ते ड्रम्स म्हणजे माझ्या घरातील खुर्च्या. जर मला टॉयलेटला किंवा आंघोळीला जायचं असेल तर ते तिथे बाहेर वाट पाहत बसायचे. माझा पहिला सिनेमा रिलीज झाल्यानंतरही ४ ते ५ वर्ष मी त्या चाळीत राहिलो आहे. मला तिथे चांगलं वाटायचं. माझे मित्र देखील मला भेटायला तिथेच यायचे. माझी आई सगळ्यांसाठी जेवण बनवायची. तिचं जेवण त्यांना खूप आवडायचं''.
काही दिवसांपूर्वी अनिल कपूर एका मुलाखतीत म्हणाला होते की,टटचाहते सेटवर त्याची नाही तर जॅकी श्रॉफची सही घ्यायला यायचे. पण जॅकी श्रॉफ स्वतः सही न देता अनिल कपूरला सही द्यायला सांगायचा. आणि म्हणून अनिल कपूरना जॅकी श्रॉफविषयी मनात खूप अुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती''.
यासंदर्भात जेव्हा जॅकी श्रॉफला विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले, ''मी खूप लकी आहे की हे सगळे माझे मित्र आहेत. अनिल कपूर मला सीनियर आहेत आणि शाहरुख खान मला ज्युनियर आहे. पण माझ्यासाठी ते फार महत्त्वाचे नाही. मला इतरांसमोर ऑटोग्राफ देताना खूप ओशाळल्यासारखं व्हायचं. पण अनिल कपूर मला सीनियर आहेत ते काहीही बोलू शकतात. खरंतर सही देण्याचा मान पहिला त्यांचा आहे आणि मग माझा. ते माझे डार्लिंग आहेत''. जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांनी 'कर्मा','राम-लखन' सिनेमात एकत्र काम केले आहे आणि ते खूप चांगले मित्र आहेत.
जॅकी श्रॉफना जेव्हा विचारलं गेलं की,आजकाल कलाकार एकमेकांप्रती मनात असुरक्षिततेची भावना बाळगून असतात,त्यांच्यावेळी तसं होतं का? तेव्हा जॅकी श्रॉफ एक मोठी गोष्ट बोलून गेले,जी खरंच विचार करण्यासारखी आहे. ते म्हणाले, ''मला वाटतं की अभिनेते आता देखील तीन किंवा दोन हिरोंचे सिनेमे करतात. आणि असुरक्षिततेची भावना काही लोकांमध्ये मुळतः असते. तेव्हा आणि आता असं फार वेगळं काही नाही''.
जॅकी श्रॉफ म्हणाले,''कोणाचे पाय कापून आपल्याला मोठं नाही बनायचं. एकमेकांना समजून पुढे गेलात तर आयुष्य चांगलं जातं. एकमेकांची प्रशंसा करायला शिका, एकमेकांचे काम चांगले कसे होईल त्याकडे लक्ष द्या. असुरक्षिततेची भावना माझ्याच कधी नव्हती,आणि येणारही नाही. हो,पण आजकालच्या मुलांमध्ये ती भावना पहायला मिळते. सगळ्यांमध्येच थोड्या-फार प्रमाणात असते. पण हे सगळं नाॉर्मल आहे आजकाल''.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.