डेली सोप : रांगडा शिवा अन् सिद्धीचे पुन्हा शुभमंगल!

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत शिवा आणि सिद्धीचं झालेलं लग्न.
‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत शिवा आणि सिद्धीचं झालेलं लग्न.

आतापर्यंत आपण प्रेम आणि राजकारणावर अनेक मालिका पाहिल्या असतील; पण प्रेम, राजकारण आणि ग्रामीण भागाची सांगड घालण्याचा प्रयत्न कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव झाला येडापीसा’ या मालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेचं चित्रीकरण सांगलीजवळील जैनापूर इथं सुरू आहे. सध्या या मालिकेत अनेक प्रकारचे ट्विस्ट सुरू आहेत. 

खरंतर पराकोटीच्या तिरस्कारातूनही सरतेशेवटी प्रेमाचा अंकुर फुलतो, इतकी ताकद प्रेमात असते. सिद्धी (विद्युला चौगुले) आणि शिवा (अशोक फळदेसाई) ही परस्परविरोधी माणसं लग्नबंधनात अडकली; पण त्यांच्या मनामध्ये कधीच एकमेकांबद्दल प्रेमभावना नव्हती. अनेक आव्हानं, कसोट्या पार केल्यानंतर आता आपली लाडकी सिद्धी आणि रांगडा शिवादादा पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. सगळे गैरसमज, भांडण संपवून आता दोघांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत.

हा विवाहसोहळा आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा झाला. घरातील मंडळी, काकी, सोनी, जलवा, बंट्या अन् बबल्याही यात सहभागी झाले होते. शिवादादानं सिद्धीला नुकतेच मस्त सरप्राईझ दिलं आहे, ज्यामुळं सिद्धी खूपच खूष झाली. आता मंगलला हे कळताच ती काय करेल, हे पाहाणं रंजक असणार आहे. यशवंत, म्हणजेच शिवाचे वडील या सगळ्यांपासून अनभिज्ञ आहेत. ते परत आल्यानंतर त्यांना आनंद होणार आहे, हे नक्की! 

सिद्धी आणि शिवा ही नावे आले की आठवत ते म्हणजे गैरसमज, भांडण, वाद-विवाद, द्वेष... पण या सगळ्या भावनांपेक्षा पवित्र भावना म्हणजे प्रेम. प्रेम सर्वांत सुंदर असते, असं म्हणतात... शिवा-सिद्धीच्या प्रेमाचा हा सुंदर प्रवास प्रेक्षकांना मालिकेत आता बघायला मिळत आहे. मात्र, शिवा आत्याबाईंकडं काय करतो, हे सिद्धीला आवडत नाही. त्यामुळं शिवाला सिद्धी आत्याबाईंच्या तावडीतून सोडू शकेल का, हे पाहणं औत्सुक्‍याचं ठरणार आहे. त्याचबरोबर सायलीच्या खुनाचा तपास लागेल का, आत्याबाईंचं गावात वर्चस्व का आहे याचं मूळ कारण समजेल का, अशा एक ना अनेक प्रश्‍नांचा उलगडाही आगामी भागांमध्ये होणार आहे. खरंतर या मालिकेची कथा आणि पटकथा चिन्मय मांडलेकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहिली आहे. विकास पाटील यांनी संवादलेखनावर प्रभुत्व दाखविलं आहे. पुष्कर रासम यांनी दिग्दर्शनातून ग्रामीण ढंग, राजकारण अन् प्रेमाचा योग्य मिलाफ साधला आहे. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. 
(शब्दांकन - अरुण सुर्वे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com