eknath shinde : महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळाला आता पूर्णविराम लागलाय असं म्हणायला हरकत नाही. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आणि महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्काच ठरला. कारण गेली काही दिवस शिंदे यांचे बंड, गुवाहाटी दौरा या सगळ्याने मोठी राजकीय उलथपालथ निर्माण झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आले. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे वाटत असतानाच एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अडीच वर्षे सुरू असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. अगदी कालच ३० जून रोजीच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीही झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई (mangesh desai) यांच्या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ( mangesh desai shared old memory of eknath shinde and his friendship and congratulate him)
धर्मवीर आनंद दिघे यांच्या चरित्रावर आधारलेला 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा १३ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने महाराष्ट्रात आनंद दिघे नावाच्या वादळाची पुन्हा आठवण करून दिली. हा चित्रपट व्हावा हे मंगेश देसाई यांचे स्वप्न होते. जे एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. केवळ चित्रपटच नाही तर खऱ्या आयुष्यातही मंगेश आणि एकनाथ शिंदे चांगले मित्र आहेत. म्हणून शिंदे यांच्या शब्दाखातर मंगेश 'धर्मवीर'चा निर्माता झाला. म्हणूनच शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने एक खास पोस्ट लिहिली आहे.
(mangesh desai post on eknath shinde)
मंगेश म्हणतो, 'आपली पहिली भेट मला आठवते साहेब. वागळे इस्टेट मध्ये एका कार्यक्रमाला भेटलो होतो 2007 साली. तुम्ही आमदार होतात त्या वेळी. तुम्हाला पहिल्यांदा भेटलॊ होतो. तसा तुम्हाला बघून घाबरलो होतो. पण तुम्ही खूप छान बोललात. सचिन जोशीला मला तुमचं व्हिसीटींग कार्ड द्यायला लावलत, आणि "काहीही मदत लागली तर सांगा" असं आवर्जून म्हणालात. माझ्या सारख्या सामान्य कलाकाराला मदत लागणारच. तीही तुम्ही एका मिनटात केलीतही. आणि त्या मदतीचे आभार म्हणून मी तुम्हाला तुमचंच एका भित्तीचित्र भेट म्हणून द्यायला आलो होतो, तेव्हाचे तुमचे शब्द मला आठवतात "हे कशाला ?आपण मित्र आहोत मंगेश".
पुढे तो म्हणतो, 'आणि खरंच मित्र झालात. अजून एक प्रसंग आठवतो. सगळे तुम्हाला नमस्कार करायचे ,मी पण केला एकदा. तेव्हा "हे करत जाऊ नका. आपण मित्र आहोत ."असच म्हणालात .आणि खरंच मित्र झालात .आणि नंतर जसजसे वर्ष सरत गेले तसे मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिलात, प्रत्येक प्रसंगात. त्या बद्दल हृदयपूर्वक आभार साहेब. माझी 2013 पासून मनात असलेली" दिघे "साहेबांवरच्या चरितपटाची मनोकामना पूर्ण करून माझी निर्माता म्हणून ओळख घडवलीत. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळ केलंत त्या बद्दल मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आज तुम्ही महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री झालात. प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा ,माणसाशी माणुसकिने वागणारा ,विरोधकांना नामवणारा आणि क्षमा करणारा अहोरात्र काम करणारा मी जवळून पाहिलेला एक समाजकारणी मुख्यमंत्री झाला याचा खूप अभिमान वाटतो. आपल्याला उदंड आयुष्य लाभो ,महाराष्ट्र घडवण्यात तुमचा मोलाचा वाट राहो हीच दत्त गुरूंकडे प्रार्थना. जय हिंद जय महाराष्ट्र.. ' अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.