मला काहीच प्रॉब्लेम नाही...

मला काहीच प्रॉब्लेम नाही...

चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार; स्पृहा, गष्मीरची हटके जोडी

पुणे - ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही...’ हे सतत कानावर पडणारे वाक्‍य... आपल्या सगळ्यांशीच जोडलेले. प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम हा असतोच. यावर सोल्यूशन आपल्याला ‘मला काहीच माहीत नाही...’ या चित्रपटातून मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता गष्मीर महाजनी यांची हटके जोडी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

सुखाच्या शोधात नकळत पैशाच्या मागे धावता-धावता सौख्य हरवून बसलेल्या केतकी आणि अजय या जोडप्याची ही कहानी. आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेमला धैर्याने सामोरे जात त्यावर सोल्यूशन कसे मिळवावे, याविषयी भाष्य करणारा हा चित्रपट. तुटलेल्या नात्यातील बंध पुन्हा नकळत जुळणाऱ्या आणि नव्याने नात्यातील संवाद सुरू करण्याऱ्या जोडप्याची ही कथा असल्याचे स्पृहा जोशी हिने सांगितले. टार्क फार्मा प्रस्तुत, फिल्मी किडा प्रॉडक्‍शन्स निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही...’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी (ता. ११) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने स्पृहा जोशी आणि गष्मीर महाजनी यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली आणि चित्रपटाविषयी गप्पा मारल्या. 

आई-वडिलांच्या विरोधात जाऊन वेगळा संसार थाटणाऱ्या जोडप्याचे आपुलकी आणि प्रेमाने जोडलेले हेच नाते कसे तुटते आणि नात्यातील तुटलेली ही दरी भरून काढण्यासाठी अजय आणि केतकी कोणते प्रयत्न करतात, यावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे गष्मीर सांगतो. 

स्पृहा म्हणाली, ‘‘मी प्रॉब्लेममध्ये आहे असे आपण सतत म्हणत असतो; पण त्यावर आपण बोलणे टाळतो. जबाबदारी झटकतो. प्रॉब्लेम्स कोणाला शेअर न केल्यामुळे त्याचे सोल्यूशनही मिळत नाही. मग, आपल्याला कशात आनंद मिळतो हेही उमगत नाही. कुठेतरी या प्रॉब्लेममुळेच लोकांमधील संवाद हरपला आहे. याच संवादाला आणि नात्यातील बंधाला पुन्हा नव्याने जोडण्यासाठी आम्ही हा चित्रपट तयार केला आहे. एका जोडप्याच्या या निख्खळ कहाणीतून आपल्याला प्रॉब्लेम काय असतात आणि त्यावर सोल्यूशन कसे मिळवावे, याचे उत्तर सापडणार आहे. या चित्रपटाला साजेसे असे दमदार संगीतही आहे.’’

गष्मीर म्हणाला, ‘‘नात्यांना वेळ द्या, आनंदाने जीवन जगा हा संदेश देणाऱ्या या चित्रपटात फक्त जोडप्यांची कथा नाही तर त्यांच्याशी निगडित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची कथा गुंफली आहे. आधीची पिढी आणि नव्या पिढीमध्ये निर्माण झालेल्या प्रॉब्लेमची ही कहाणी असून, ती प्रत्येक माणसाची गोष्ट आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला लावेल. कुठल्याही वयोगटातील व्यक्तीशी चित्रपट रिलेट करतो. म्हणून या चित्रपटात काम करण्याचा अनुभव चांगला होता. संगीत आणि कथेच्या बाबतीत म्हटलं तर चित्रपट खूप छान झाला आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com