ठाणे: ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासांची मोडतोड केली जात असल्याचे आरोप माजी खासदार संभाजीराजे यांनी केला होता. आता हर हर महादेव चित्रपटावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील आक्षेप घेतला आहे. त्यांनी आज ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटाच्या चालू शोमध्ये जाऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर निघून जाण्याचे आवाहन केले.
ठाणे शहरातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव या सिनेमा सुरू असताना आव्हाड चित्रपटगृहात आले आणि त्यांनी लोकांना चित्रपट सोडून बाहेर जाण्याचे आवाहन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी चित्रपटाबद्दल असलेले त्यांचे आक्षेप देखील सांगितले आहेत.
यावेळी आव्हाड म्हणाले की, चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी लढताना दाखवलं आहे, असं कुठेही नव्हतं. नंतर त्यांनी असं म्हटलंय जसं रघुनाथाला हनुमान होता तसे बाजीप्रभू हे शिवाजी महाराजांना होते. तर तसं नाहीये. तेथे जेधे-बांदल नावाचे सरदार होते ते शिवाजी महाराजांचे त्यांच्याबाबतीत हे वाक्य आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत.
शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मांडीवर झोपवलंय आणि राजे त्याचं पोट फाडतायत असं नाहीये, असे आव्हाडांना यावेळी सांगितलं. चित्रपटात दाखवण्यात आलेले मावळे दाढी नसलेले दाखवण्यात आले आहेत. तुम्ही मला सांगा मावळा कसा असतो दिसायला? शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं सौंदर्य कशात आहे, तर ते त्यांच्या राकटपणा, मिशा, त्यांचे हात किती मजबूत आहेत आणि ते तलवार कशी उचलता त्याच्यात आहे. मग ही विकृती दाखवता कशाला , असा सवाल आव्हाड यांनी चित्रपट निर्मात्यांना केला आहे.
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम आणि विकृत करण्याचा जी पुरंदरी परंपरा आहे, ती चित्रपटसृष्टीच्या माध्यामातून महाराष्ट्रात पोहचवण्याचं काम सुरू आहे त्याला आमचा विरोध आहे असेही आव्हाड यावेळी म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.