Prashant Damle News : मराठी नाट्यसृष्टीमध्ये तीन दशकांहून अधिक काळ स्वताच्या नावाची वेगळी ओळख निर्माण करणारे कलावंत म्हणून प्रशांत दामले यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. मराठी नाटक क्षेत्रात मोठा चाहतावर्ग तयार करणारे कलावंत म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते. आता दामले हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित बालगंधर्व रंगमंदिर ५५ वा वर्धापन दिन सोहळा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी थेट भेट या कार्यक्रमात सौमित्र पोटे यांनी प्रशांत दामले यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. तेव्हा त्यांनी मराठी नाट्यसृष्टीतील प्रवास आणि आठवणी याविषयी वेगवेगळ्या गोष्टींविषयी सांगितले.
Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?
दामले म्हणाले, प्रत्येक व्यवसायात चुका करण्याची संधी असते, मात्र परत - परत एकच चूक होऊ नये अशआ मतांचा मी आहे. कुठलाही आणि कितीही मोठा कलाकार असाल तरी त्यांच्याकडे अपमान, नकार पचवण्याची ताकद असलीच पाहिजे. अपमान का झाला? हे समजून घेऊन काय करायचे नाही हे ठरवले की आपण योग्य दिशेने जातो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
छंदाचे व्यवसायात रूपांतर झाले की ते सुखं असतं असे सांगत प्रशांत दामले म्हणाले, आजपर्यंत माझे १२ हजार ७२३ प्रयोग झाले आहेत, त्यामध्ये फक्त दोन वेळा प्रयोग रद्द करावे लागले आणि तेही माझा आवाज बसल्यामुळे. माझ्या या प्रवासात माझे सहकारी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे होते. मला जे हवं होतं ते मिळत नाही असे वाटल्याने एकवेळ थांबाव वाटलं होत पण विचार केला मी दुसरं करणार काय? असा प्रश्न होता.
निर्माता म्हणून माझ्यावर एक वेगळी जबाबदारी आहे याचीही जाणीव झाली यामुळे मी तो विचार मनातून काढून टाकला आज मात्र निश्चयाने सांगतो की जो पर्यंत माझे पाय चालतात तो पर्यंत रंगभूमीची सेवा करणार. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाविषयी बोलताना दामले म्हणाले, मी काही बदलायच्या भानगडीत पडत नाही. मी नव्याने करण्यावर विश्वास ठेवतो.आपले यशवंत नाट्य संकुल बंद होते ते सुरू केले. नाट्यसंमेलन ही एक महत्वाची जबाबदारी आहे.ती पार पडणारच.
नवोदित कलाकारांना मुंबईत आसरा कसं द्यायचा यावर प्राधान्यक्रमाने विचार करतोय, नाट्यगृहांची दुरावस्था दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नाट्य परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्व ५८ शाखांचे ऑडिट करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारूडसाम्राट सावता फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भारुडाने झाली. यानंतर वनमाला लोणकर, छाया जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळागौर सादर केली.
दुपारच्या सत्रात महिलांसाठी विशेष आयोजित केलेल्या लावणी महोत्सवात नमिता पाटील, अर्चना जावळेकर, पूनम कुडाळकर, सुप्रिया जावळेकर, कामिनी गायकवाड, रुही संगमनेर, सीमा पटेल, पूजा निर्भवणे, अलका जगताप, वर्षा पवार,जुई आणि अंजली नागपूरकर यांनी आपल्या अदाकारीने रसिकांची मने जिंकली. यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदि मान्यवर उपस्थित होते. लावणी महोत्सवाचे सूत्रसंचालन कुमार पाटोळे, अभिजित राजे यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.