
Sachin Pilgaonkar: मराठी माणूस आणि संबंध महाराष्ट्राला दुकावणारे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केल्यानंतर आता मोठी प्रमाणात त्यांच्यावर टीका होत आहे. राज्यपालांनी संदर्भात सारवासारव करणारे स्पष्टीकरण दिलेही परंतु लोकांच्या मनातील निषेधाची भावना अगदी तीव्र आहे. आता मनोरंजन विश्वातूनही राज्यपालांवर टीका होत आहे. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही राज्यपालांच्या विधानावर भाष्य केले आहे.
(Sachin Pilgaonkar comment On Bhagat Singh Koshyari controversial Statement)
'मुंबई गुजराती, राजस्थानी लोकांमुळे आर्थिकदृष्ट्या सधन आहे. ते गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. त्यांनंतर त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत अनेकांनी टीका केली. आता अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनीदेखील मत मांडले आहे.
नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात भगत सिंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानाबाबत सचिन पिळगावकर यांना विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले, 'मला यासंदर्भात ज्ञान नाही, राज्यपाल असं का म्हणाले हे तेच सांगू शकतात. राजकीय गोष्टींशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांनी खुलासा केला हे देखील मला माहीत नाही. राजकारण हा आमचा विषय नाही. पण आम्ही मराठी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.'
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी राज्यपालांनी आपल्या भाषणात हे वादग्रस्त विधान केले. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही,असे वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केले होते. या कार्यक्रमाला भाजप आमदार नितेश राणे, भारती लव्हेकर आणि खासदार नवनीत राणा देखील उपस्थित होत्या. मात्र राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करण्याऐवजी त्यांनी राज्यपालांच्या भाषणावर टाळ्या वाजवल्या. या घटनेला सध्या मोठा विरोध होत आहे.