अभिनयासोबतच आपल्या विचारांनी हिंदूंना संबोधित करणारे, सावरकरांची विचारधारा जपणारे अभिनेते शरद पोंक्षे (sharad ponkshe) त्यांच्या विधानाने कायमच चर्चेत असतात. त्यांची विचारधारा आणि राजकीय मते स्पष्ट असल्याने त्यांच्याविषयी अनेक मत मतांतरे आहेत. 'हे राम,नथुराम' हे त्यांचे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. परंतु गांधी विचारांना धक्का लावणारे हे नाटक असल्याची टीका अनेकांकडून झाली. सध्या हे नाटक पोंक्षे यांनी थांबवले असले तरी व्याख्याने आणि चर्चासत्रे यातून ते सावरकरांचे विचार जनमानसात पोहोचवत आहेत. हेच शरद पोंक्षे रविवारी पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
'जातीयवाद्यांनी राज्यातील वातावरण गढूळ केले आहे. ते स्वच्छ करण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यायला हवा. फुले, शाहू, आंबेडकरांनीही समाजसुधारणा केली आहे. त्यात ब्राह्मणांचाही वाटा मोठा आहे. मात्र, जाती संपविण्यासाठी ब्राह्मणांनी एकत्र आले पाहिजे,' असे आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी यावेळी केले.
'जात संपविण्यासाठी मी पंधरा वर्षे व्याख्याने देत आहे. मी ब्राह्मण असलो, तरी मला जातीचा दुराभिमान नाही. जात संपली पाहिजे; मनुष्य हा धर्म टिकला पाहिजे. जात संपणे अशक्य आहे म्हणून त्यासाठी प्रयत्न करायलाच नको असे म्हणून चालणार नाही,' याकडे पोंक्षे यांनी लक्ष वेधले. जात संपविण्याच्या कामात कधीतरी यश मिळेल. आपले राज्य, देश कधी तरी जातमुक्त होईल, अशीही अपेक्षा व्यक्त करताना सध्या मी बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास सुरू केला आहे. मला जेवढे सावरकर प्रिय आहेत; तेवढेच आंबेडकरही प्रिय आहेत, असेही ते म्हणाले.
आम्ही सारे ब्राह्मण' पाक्षिक आणि 'ब्राह्मण व्यावसायिकपत्रिका' मासिकाच्या वतीने यंदाचा 'ब्राह्मणभूषण पुरस्कार' पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला.शरद पोंक्षे लिखित 'मी आणि नथुराम' या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे या वेळी लोकार्पण करण्यात आले. ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पोंक्षे यांची मुलाखत घेली. त्यामध्ये त्यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.