
Twinkle Khanna on Rakshabandhan: अभिनेत्री ट्विंकल खन्ना आता लेखिका बनलीय हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. ती नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर सोशल मीडियावर आपलं मतप्रदर्शन करत असते. आता तिनं आपल्याच नवऱ्याच्या म्हणजे अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन' सिनेमाविषयी आपलं मत मांडलं आहे. आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन सिनेमात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमा रक्षाबंधनच्या दिवशीच म्हणजे ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. त्या आधी आता ट्विंकल खन्नाची सिनेमाविषयीची एक पोस्ट चर्चेत आली आहे. नेमकं काय म्हणाली आहे ट्विंकल खन्ना.(Twinkle Khanna reviews Akshay Kumar, Bhumi Pednekar's 'Raksha Bandhan)
तिनं तिच्या पोस्टच्या माध्यमातून अर्थातच अक्षय कुमारच्या सिनेमाची प्रशंसा केली आहे. तसंच तिनं सिनेमा रिलीज आधीच सांगून टाकलं आहे की तुम्ही मध्यांतरा पू्र्वी जितके हसता त्याच्या उलट मध्यांतरा नंतर रडता. हा सिनेमा समाजात जे घडतंय ते सत्य दाखवतं असं ती म्हणाली आहे.
ट्विंकलने त्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे,''रक्षाबंधन पाहताना अर्धा वेळ तर मी हसतच होते आणि पुढचा अर्धा भाग पाहताना माझे अश्रू थांबत नव्हते. हा सिनेमा भारतातील संस्कृती,रुढी,परंपरा यावर भाष्य करतो. आपण आता आधुनिक होतोय तसं अनेक गोष्टींच्या व्याख्या आपण बदलल्या आहेत. पूर्वी ज्याला हुंडा म्हणायचे त्याला आपण गिफ्ट म्हणतो. फरक काही नाही फक्त आपण त्याला नवीन नाव दिलं. आजही भारतात अनेक ठिकाणी जुन्या रुढी-परंपरा तशाच सुरु आहेत''.
दिग्दर्शक आनंद एल रायनं खूप छान पद्धतीन सिनेमा प्रेझेंट केला आहे. भावा-बहिणीतील मस्ती, एकमेकांना दिला जाणारा पाठिंबा, आणि सर्व परस्थितीवर मात करुन मिळवलेला विजय हे खूप छान पद्धतीनं स्टोरीत गुंफलं आहे. फक्त सिनेमा हे माध्यम आहे जे एखादी गोष्ट लोकांच्या केवळ डोक्यात नाही तर मनापर्यंत पोहोचवू शकते,त्यांच्या मनावर बिंबवू शकते. एवढी ताकद सिनेमात आहे. रक्षाबंधन तुम्हाला खूप हसवेल आणि एक चांगला मेसेजही देऊन जाईल. मी चॅलेंज लावते, हिम्मत असेल तर सिनेमा पाहिल्यानंतर थिएटरमधून कोरड्या डोळ्यांनी बाहेर पडून दाखवा. कारण मला माहित आहे,असं घडूच शकत नाही,अर्धा सिनेमा तुम्हाला भावूक बनवेल,डोळ्यांच्या कडा पाणावतील''. ट्विंकलच्या या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे.