भाजपमधील बंड झाले थंड, नाराजी मात्र राहणार कायम! 

NIVDNUKA.jpg
NIVDNUKA.jpg

औरंगाबाद  : पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारीवरून सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे भाजप चर्चेत आहे. निष्ठावंत विरुद्ध मर्जीतील असा संघर्ष सध्या पक्षात पहावयास मिळत आहे. मात्र, असे असले तरी पक्षाच्या धोरणाविरोधात जाण्याची कोणाचीच हिंमत नाही. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांचे बंड थंड होण्याचीच शक्यता आहे. मात्र, काम करूनही संधी न मिळाल्याची सल मात्र कायम राहणार आहे.

आता नाराज असलेल्यांना मनवत त्यांना पुन्हा निवडणुकीच्या कामाला लावण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात आहे. आज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे, पंकजा मुंडे, निलंगेकर यांनी नाराज असलेल्या प्रवीण घुगे यांची समजूत काढत कार्यकर्ता मेळाव्यास आणले. ही सुरुवात असून सर्वजण माघार घेतील. तथापि, नाराज उमेदवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले शिरीष बोराळकर यांना उमेदवारी पक्षातर्फे जाहीर करण्यात आली. पदवीधरसाठी पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेले प्रवीण घुगे, बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे किशोर शितोळे आणि माजीमंत्री जयसिंगराव गायकवाड हे इच्छुक आहेत. बोराळकरांना संधी मिळाल्यामुळे हे चारही जण प्रचंड नाराज झाले आहेत.

यातील सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल करीत बंडाचे निशाण फडकवले आहे. यातील प्रवीण घुगे हे गेल्या तीस वर्षांपासून विद्यार्थी, शिक्षकांचे प्रश्‍न मांडत आहेत. यासह गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी पदवीधरसाठी विद्यार्थी परिषद, संघाच्या पदाधिकाऱ्यांसह पदवीधरसाठी अडीच लाखांहून अधिक नोंदणी केली आहे. असे मोठे काम असतानाही डावलल्यामुळे अनेकजण नाराज झाले होते. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होत आहे. उमेदवाराच्या कार्यालयाचे उद्‍घाटन, कार्यकर्ता मेळाव्यातून नाराज असलेल्यांना परत आणण्याचे सूतोवाच करण्यात आले. यासह बीडसाठी रमेश पोकळे यांनाही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षातर्फे पंकजा मुंडे यांना जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बिहारमधील विजयामुळे सकारात्मक वातावरण 
बिहारमधील विजयामुळे सकारात्मक वातावरण आणि मराठवाड्यातील पक्षाच्या संघटनाचा उपयोग पक्ष करणार आहे. त्यासाठी आधी नाराजांना शांत करण्याची जबाबदारी पक्षावर राहील. त्यादृष्टीने काम करण्यात येत आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com